नवी दिल्ली : येत्या सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणातील सुनावणीचा कालावधी रोज एक तासाने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 18 ऑक्टोबर पर्यंत ही सुनावणीची प्रक्रिया पुर्ण करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने या आधीच घोषित केला आहे. त्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.
सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. 18 ऑक्टोबर पर्यंत दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद आणि कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत या महत्वपुर्ण विषयाचा निर्णय लागण्याची शक्यता आहे. गेली अनेक दशके देशाचे सारे सार्वजनिक जीवन या विषयामुळे अस्वस्थ आहे. अलाहाबाद हायकोर्टाने या वादग्रस्त जमीनीचे त्रिभाजन करण्याचा निर्णय देत गर्भगृहाची जागा मात्र राम मंदिरासाठी देण्याचा आदेश दिला होता. तो निकाल येऊनही अनेक वर्षे लोटली असून लोकांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा आहे.