Tamil Nadu Election : तमिळनाडू सरकारने जवळपास ३८ लाख नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी २ हजार रूपयांचा विशेष निधी जमा केला. त्यामुळे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीआधी राज्य सरकारकडून निधीची खैरात होण्याची पुनरावृत्ती तमिळनाडूत होताना दिसत आहे. द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता असणाऱ्या तमिळनाडूत एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीचे वेळापत्रक पुढील काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात त्या राज्यातील सरकारने जनतेसाठीच्या कल्याणकारी योजनांना गती देत सरकारी तिजोरीतून आर्थिक मदतीचा ओघ सुरू केला आहे. त्याचा प्रत्यय मुख्यमंत्री आणि द्रमुक प्रमुख एम.के.स्टॅलिन यांनी मंगळवारी केलेल्या घोषणेतून आला. ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांगांना दरमहा सरकारकडून पेन्शन दिली जाते. त्याव्यतिरिक्त विशेष निधीच्या रूपाने अतिरिक्त सहाय्य देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित लाभार्थींच्या आर्थिक अडचणी कमी करण्याच्या उद्देशातून सरकारने पाऊल उचलले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. तमिळनाडूतील महिलांना राज्य सरकारकडून दरमहा आर्थिक मदत दिली जाते. त्यांना काही दिवसांपूर्वीच विशेष उन्हाळा पॅकेज अंतर्गत अतिरिक्त प्रत्येकी २ हजार रूपयांचे सहाय्य करण्यात आले.