Nagar | ज्ञानेश्वर सृष्टी उभारण्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव!

नगर, (प्रतिनिधी) – ज्ञानेश्वर सृष्टी उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला असून त्याला लवकर मंजूरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर उभारण्यात येणारे अहिल्यादेवींचे स्मारक आणि नेवासा येथील ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प जिल्ह्याच्या दृष्टीने माइलस्टोन ठरणार असून,
दोन्ही प्रकल्पाच्या आराखड्यात सुधारणा करून लवकराच याचे सादरीकरण केंद्र व राज्य सरकार समोर करण्यात येणार असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
अहिल्यादेवी होळकर आणि नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदीर परीसराच्या विकासाच्या आराखड्याचे सादरीकरण पालकमंत्री विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकरांचे जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून अहिल्यानगर येथे स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला. याबाबतची कार्यवाही सुरू झाली असून प्रकल्पाचा आराखडा तसेच स्मारकासाठी शहरात जागा निश्चित करण्याचे काम प्रशासकीय स्तरावर अंतिम टप्प्यात आले आहे.
महिला सक्षमीकरणाची संकल्पना स्मारक उभारण्याची आहे. यासाठी स्मारक उभारणीतील सर्व बारकावे तपासून पाहीले जात आहेत.आराखडा अंतिम झाल्यानंतर याचे सादरीकरण राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर केले जाणार असून स्मारकासाठी केंद्र सरकारचा निधी उपलब्ध व्हावा, असा प्रयत्न असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
नेवासा येथील मंदीर परीसर विकास आरखड्याच्या संदर्भात राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा निर्णय घेतल्याने निधी उपलब्ध होणार आहे.
या तिर्थस्थानाचे अध्यात्मिक महत्व लक्षात घेवून अकरा एकर जागेत स्मारकाचा आराखडा त्या तिर्थस्थानाचे असलेले महत्व लक्षात घेवून त्या अनुभूतीने, व्हावा आशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.
ज्ञानेश्वर सृष्टी उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला असून त्याला लवकर मंजूरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने दोन्ही प्रकल्पाचे काम माइल स्टोन ठरणार आहे.
जिल्ह्याचा तिर्थक्षेत्र पर्यटन आराखड्याच्या माध्यमातून स्मारकाचे होणारे काम पर्यटनाच्या जोडीने रोजगार निर्मितीला पूरक ठरणार असल्याचा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.





