Pune District : परिवर्तन एक्सप्रेसमधून जुन्नरच्या विकासाची हाक
Pune District :'जुन्नर तालुका इतिहास, निसर्ग आणि पर्यटनाने समृद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेल्या या भूमीला देश-विदेशातील पर्यटकांशी अधिक वेगाने जोडण्यासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था आवश्यक असल्याचा संदेशही देखाव्यातून देण्यात आला आहे.

आळेफाटा : गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न आणि विकासाच्या अपेक्षांना वाचा फोडण्याची परंपरा यंदाही पाहायला मिळत असून, पिंपरी पेंढार येथील श्री चारंगबाबा नवतरुण मित्र मंडळाने साकारलेला ‘परिवर्तन एक्सप्रेस’ हा चलचित्र देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. पुणे-नाशिक रेल्वे प्रत्यक्षात धावावी आणि तिच्या माध्यमातून जुन्नरसह आंबेगाव, खेड, पारनेर व संगमनेर परिसराच्या विकासाला गती मिळावी, या जनभावनेला या देखाव्यातून कल्पकतेने मांडण्यात आले आहे.
‘परिवर्तन एक्सप्रेस’ ही केवळ रेल्वेची प्रतिकृती न ठेवता ग्रामीण भागाच्या विकासाचे प्रतीक म्हणून साकारण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातून पुणे-नाशिक रेल्वे धावताना दाखविताना, रेल्वे सुरू झाल्यास शेती, व्यापार, शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि स्थानिक उद्योगांमध्ये कोणते बदल घडू शकतात, याचे चित्रण करण्यात आले आहे. रेल्वेमुळे शेतकर्यांना पुणे, नाशिकसह मोठ्या बाजारपेठांपर्यंत शेतमाल पोहोचविणे सुलभ होईल, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होईल, अशा अपेक्षा देखाव्यातून व्यक्त करण्यात आल्या आहेत.
जुन्नर तालुका इतिहास, निसर्ग आणि पर्यटनाने समृद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेल्या या भूमीला देश-विदेशातील पर्यटकांशी अधिक वेगाने जोडण्यासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था आवश्यक असल्याचा संदेशही देखाव्यातून देण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार्या रेल्वेमुळे परिसरातील पर्यटनासह शेती, व्यापार, शिक्षण, रोजगार आणि उद्योगांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
वर्षानुवर्षे चर्चेत असलेल्या पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा प्रश्नही या देखाव्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. हा प्रकल्प केवळ दोन शहरांना जोडणारा वाहतूक प्रकल्प नसून, उत्तर पुणे जिल्ह्यासह लगतच्या ग्रामीण भागाच्या विकासाशी निगडित असल्याची भावना मंडळाने मांडली आहे. राजकीय श्रेयवादापेक्षा नागरिकांच्या दीर्घकाळच्या अपेक्षा आणि परिसराच्या विकासाची गरज लक्षात घेऊन प्रकल्पाबाबत ठोस निर्णय व प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा या देखाव्यातून व्यक्त करण्यात आली आहे.
देखावा साकारण्यासाठी दत्तात्रय बारकू विधाटे, मयूर विठ्ठल दुरगुडे, वेदांत संदीप कुटे, संस्कार सचिन दुर्गुडे, कुणाल नितीन विधाटे, रोहित महेंद्र गव्हाणे, निशांत विठ्ठल दुर्गुडे, गोरक्षनाथ बारकू विधाटे, शुभम अरुण दुरगुडे, भूषण दुरगुडे, अमित जाधव, अक्षय ज्ञानेश्वर जोरी, कल्पेश कैलास दुरगुडे, मंदार अविनाश विधाटे, ओंकार प्रमोद दुरगुडे, अनिकेत नामदेव दुरगुडे, ऋषिकेश महादू दुरगुडे, सुमित नवनाथ विधाते आणि सिद्धेश भगवान दुर्गुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात साकारलेली ‘परिवर्तन एक्सप्रेस’ नागरिकांना मनोरंजनाबरोबरच आपल्या भागाच्या विकासाचा प्रश्न विचारणारी ठरत आहे. ‘आपल्या भागात विकासाची रेल्वे प्रत्यक्षात कधी धावणार?’ हा सवाल उपस्थित करणारा हा देखावा पिंपरी पेंढारच्या नवतरुणांच्या सामाजिक जाणिवेचे आणि विकासाच्या अपेक्षेचे लक्षवेधी दर्शन घडवित आहे.
विकासासाठी परिवर्तन गरजेचे
‘विकास हवा असेल तर परिवर्तनाची सुरुवात करावी लागेल’ हा संदेश देणार्या या देखाव्यातून विकासाच्या घोषणांपलीकडे प्रत्यक्ष कृतीची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. विशेषतः पुणे-नाशिक रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात कधी साकार होणार, हा प्रश्नही नागरिकांच्या मनात उपस्थित करण्यात आला आहे. या देखाव्याची संकल्पना संकेत देविदास विधाटे यांनी मांडली असून, मंडळातील युवकांच्या एकत्रित प्रयत्नांतून ती प्रत्यक्षात साकार झाली आहे. कल्पकता, तंत्रज्ञान आणि सामाजिक प्रश्न यांचा सुरेख मेळ साधत तयार करण्यात आलेल्या या चलचित्र देखाव्यातून रेल्वे आल्यास शेतकरी, विद्यार्थी, कामगार, उद्योजक आणि तरुणांच्या जीवनात होणारे संभाव्य बदल प्रभावीपणे दाखविण्यात आले आहेत.





