नारायण सातपुते
नदीकाठावरील जमिनी खचण्याच्या प्रकारात वाढ; नागरिकांतून भीतीचे वातावरणमळीच्या शेतांमध्ये भगदाड…
महापुराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेतजमिनी खचल्या आहेत. काही ठिकाणी माती वाहून गेल्यामुळे मळीच्या शेतीला मोठे भगदाड पडलेले आहेत. जमिनी वाहू लागल्याने शेतकऱ्यांपुढे आता पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकवेळ नुकसान झालेल्या पिकाची भरपाई मिळेल पण वाहून गेलेली जमीन पुन्हा मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाठार – अतिवृष्टी व कोयना धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नद्यांना महापूर येऊन अनेक गावे सलग तीन ते चार दिवस पाण्याखाली गेली होती. या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. कोणाची घरे कोसळली, शेतातील पिके वाया गेली, फरशीपूल वाहून गेले, रस्ते खचले असे विदारक चित्र पाटण तालुक्यासह कराड तालुक्यातही पहायला मिळत आहे. आता त्याबरोबरच नदीकाठावरील गावांमधील जमिनी खचण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे नागरिकातून भिती व्यक्त होत असून या महापुराचा सुजलाम-सुफलाम असणाऱ्या कृष्णा काठाला मोठा फटका बसला आहे.
सन 2006 नंतर तब्बल 13 वर्षांनंतर एवढा मोठ्या महापुराचा सामना सर्वांना करावा लागला. महापुराचे संकट एवढे भयावह होते की यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्वात ज्यास्त नुकसान नदीकाठावरील लोकांचे झाले आहे. नदीकाठावरील शेतजमीन म्हणजे मळीची शेती पिकली तर चांगली पिकते नाहीतर नुकसानच होते. गेली कित्येक वर्षे असा महापूर आला नव्हता. त्यामुळे या परिसरात यावर्षी एवढे नुकसान यापूर्वी झालेले पाहावयास मिळाले नाही.
दि. 6 ते दि. 12 ऑगस्ट दरम्यानच्या कृष्णा नदीच्या महापुराचे पाणी कराड तालुक्यातील रेठरे पुलावरून गेले होते. या कालावधीत तब्बल चार पाच दिवस नदीकाठावरील शेती पुराच्या पाण्याखाली होती. या कालावधीत नदीकाठावरील शेतीचे तसेच मळीच्या शेतातील ऊस पिकाची पूर्णपणे नासाडी झाली आहे.
सध्या महापूर ओसरला असला तरी त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. जास्त दिवस पाण्याखाली असणारा नदीकाठावरील भूभाग खचू लागला आहे. त्यामुळे नदीचा विस्तार वाढला जात असून नदीकाठावरील शेतामध्ये जाण्यास शेतकऱ्यांना भीती वाटत आहे. नदीकाठावर अनेक गावांचे पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइन, शेतीचे पाणी उपसा करणारे पंपही पाण्याखाली जाऊन नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे गावांपुढे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जमिनी वाहून जाण्याने नदीमध्ये गाळाचे प्रमाणही वाढत आहे. महापुरात खचलेल्या शेतजमिनीचे तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.