Mumbai Local : “जीवनाची लढाई की मृत्यूची वाटचाल?” २० वर्षांत ५१ हजार प्रवाशांचा मृत्यू; मुंबईची जीवनवाहिनी केव्हा बदलणार?

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत रोजच्या जीवनाचा भाग बनलेली मुंबई लोकल आता ‘जीवनवाहिनी’ ऐवजी ‘मृत्यूवाहिनी’ ठरत असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. गेल्या वीस वर्षांत मुंबईत लोकल रेल्वेच्या अपघातात तब्बल ५१ हजार प्रवाशांचे प्राण गेले आहेत. तर गेल्या वर्षभरात अडीच हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी धक्कादायक आहे.
मुंबईच्या लोकलमध्ये दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात. यामध्ये कर्जत, कसारा, पनवेल, डहाणू, उरण अशा लांबच्या भागातून चार-पाच तास प्रवास करणारे नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. दिवसभरात २,३४२ लोकलच्या फेऱ्या होतात. विशेषतः बदलापूर, खोपोली मार्गावर तर गर्दी इतकी असते की ‘मुरगीलाही शिरायला जागा मिळत नाही’. त्यामुळे गाडीत चढण्यासाठी मारामारी, चेंगराचेंगरी, धक्काबुक्की हे रोजचेच चित्र आहे.
‘विकी’च्या घराचा आधार हरपला
मध्य रेल्वेच्या मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान दोन लोकल एकाच वेळी समोरासमोर जात असताना दरवाज्यावर लटकलेले प्रवासी एकमेकांना धडकले. यामध्ये कल्याणच्या विकी बाबासाहेब मुख्यदल यांचा मृत्यू झाला. ३३ वर्षीय विकी रेल्वे पोलिसात नुकतेच रुजू झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, लहान मुलगा आणि वृद्ध आई-वडील आहेत. या अपघाताने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले.
महिला प्रवाशांचेही संकट कायम
महिलांचाही प्रवास टळत नाही. दहा ते बारा लाख महिला प्रवासी दररोज लोकलमध्ये प्रवास करतात. पण त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण महिलांमध्येही वाढताना दिसते.
सरकारी घोषणा आणि प्रत्यक्ष परिस्थिती
जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मृतांच्या नातेवाइकांची भेट घेऊन पाच लाखांची मदत घोषित केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जखमींची विचारपूस केली. मात्र, हे अपघात थांबण्यासाठी फक्त घोषणा नव्हे, तर मूलगामी सुधारणा हवीत, अशी मागणी नागरिंकामधून होत आहे.



