Gold Smuggling : सोने तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यासह ६ जणांना अटक; रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत केला होता भाजपमध्ये प्रवेश
Gold Smuggling : "आता मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण यांचे काय म्हणणे आहे?," संजय राऊतांचा सवाल

Gold Smuggling : सोने तस्करी प्रकरणात महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास केलेल्या कारवाईत डीआरआयने तब्बल ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने आणि इतर संशयास्पद मुद्देमाल जप्त केला. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. भाजप पदाधिकारी अजित आचरेकर नावाच्या व्यक्तीसह 5 जणांनाही अटक करण्यात आली आहे.
आचरेकर भाजप कामगार संघटनेचा चिटणीस असल्याची माहिती असून काही महिन्यांपूर्वी भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्याचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता. पक्षाकडून कामगार संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
या आंतरराष्ट्रीय तस्करी प्रकरणात भाजपच्या कामगार संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांच्यासह रोहित कुमार सिंग, संतोष सुभाष, समीमुल्ला शहा, हमीद लेबेरीफखान आणि फलिल मोहम्मद कासिम अशा ६ आरोपींना डीआरआयने अटक केली. या कारवाईमुळे मुंबईसह राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मुंबई विमानतळ परिसरात काही व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद आढळल्या होत्या. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ६ जून रोजी पहाटे २:३० वाजण्याच्या सुमारास अधिकाऱ्यांनी विमानतळ परिसरात सापळा रचून या आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर संशयितांची झाडाझडती घेत सखोल चौकशी केली असता अधिकाऱ्यांच्या हाती सोन्याचे मोठे घबाड लागले. जप्त करण्यात आलेल्या या सोन्याचे बाजारमूल्य ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. Gold Smuggling
संजय राऊतांचा फडणवीस, चव्हाणांवर निशाणा
या प्रकरणावरून शिवसेना नेते (UBT) संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “शिवसेनेचे कोकणातील नेते वैभव नाईक यांची वारंवार चौकशी सुरू आहे. त्या चौकशीला दिशा नाही. नाईक आंदोलन करायला लागले की त्यांना नोटीस जाते. अशा वेळी फडणवीस यांनी लक्ष घातले पाहिजे. विरोधी पक्षाच्या लोकांनाच का टारगेट केले जाते?,” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
“काल मुंबई विमान तळावर सोने तस्करी प्रकरणात भाजपच्या लोकांना अटक झाली. यावर फडणवीस का नाही बोलत आहेत? शिवसेनेचे युनियनला आव्हान देण्यासाठी हि घुसखोरी करण्यात येत आहे. योगेश म्हणून आहेत, त्यांची ही गॅंग आहे. रवींद्र चव्हाण थेट हॉटेलमध्ये घुसतात, त्यांच्या सोबत असलेले लोक पकडले आहेत. आता मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण यांचे काय म्हणणे आहे?,” असेही राऊत यांनी विचारले आहे. Gold Smuggling
हेही वाचा:
Raveena Tandon : ‘हर हर गंगे’… रवीना टंडनचा आध्यात्मिक अंदाज; स्कूटीवर केला प्रवास






