पुरामध्ये राज्यात तब्बल 1700 गायी-म्हशींचा मृत्यू

पुणे – गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे एकूण 1700 पशुधन गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दि.29 ऑगस्टअखेर झालेल्या पंचनाम्याच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागांत अद्यापही पंचनाम्याचे काम सुरू असून, या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पशुधन गमावण्याचे प्रमाण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तर शेळ्या, मेंढ्या व या पशुधनाची एकत्रित आकडेवारी 2 लाख 34 हजार 370 एवढी आहे. महापुरानंतर गमावलेल्या पशुंची आकडेवारी संकलन सुरू करण्यात आले आहे. गमावलेल्या पशुधनामध्ये सांगलीतील 276 गायी आणि 238 म्हशींचा समावेश आहे. तर कोल्हापूरात 270 गायी आणि 276 म्हशींचा समावेश आहे. पंचनाम्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला दुभत्या जनावराची 30 हजार व प्रत्येक शेतकऱ्याला किमान तीन जनावरांची नुकसान भरपाई दिली जात आहे. ही मदत मृत जनावरांच्या बाजारभावाच्या तुलनेत तोकडी असून, त्यामध्ये वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.





