इस्रायलच्या क्रूर हल्ल्याने विश्व हादरले ! इराणी अणुशास्त्रज्ञासह ११ कुटुंबीय ठार, भयावह वास्तव समोर

तेहरान : इराण आणि इस्रायलमधील नुकत्याच संपलेल्या युद्धानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराणी माध्यमे आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमधील बातमीनुसार इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये केवळ काही ठराविक शास्त्रज्ञच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही लक्ष्य करण्यात आले होते. विशेषतः एका हल्ल्यात, एका अणुशास्त्रज्ञासह त्याच्या कुटुंबातील सर्व ११ सदस्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला, मुले आणि वृद्धांचाही समावेश होता.
१३ जून रोजी इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इराणच्या अनेक अणु तळांना, शास्त्रज्ञांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य केले गेले होते. या कारवाईसाठी बराच काळ तयारी केली जात होती आणि इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद या लक्ष्यांच्या प्रत्येक हालचालीवर सतत लक्ष ठेवून होती.
या हल्ल्यांमध्ये फक्त या शास्त्रज्ञांनाच ठार करण्यात आले होते असा दावा इस्त्रायलने केला होता; परंतु आता युद्धबंदीनंतर समोर आलेल्या वृत्तांमुळे या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण आता जी माहिती उघड होऊ लागली आहे ती धक्कादायक अशीच आहे.
१० शास्त्रज्ञांना केले लक्ष्य
इस्रायलने एकूण १० इराणी अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य केले होते. यापैकी एका शास्त्रज्ञाच्या कुटुंबाने माध्यमांना सांगितले की हल्ल्याच्या वेळी त्याचे संपूर्ण कुटुंब घरात उपस्थित होते. शास्त्रज्ञासह कुटुंबातील सर्व ११ सदस्यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये महिला, मुले आणि वृद्धांचे मृतदेह दिसत आहेत. या घटनेने इराणसह संपूर्ण जग हादरले आहे.
हा प्राणघातक हल्ला इराणच्या उत्तरेकडील भागात कॅस्पियन समुद्राजवळील अस्तानेह अशरफीह शहरात झाला. इराणच्या इंग्रजी भाषेतील सरकारी वाहिनी प्रेस टीव्हीने वृत्त दिले आहे की मारल्या गेलेल्या शास्त्रज्ञाचे नाव सेदिघी साबर होते. अल जझीराच्या वृत्तात म्हटले आहे की हल्ल्याच्या वेळी संपूर्ण कुटुंब घरात होते आणि कोणालाही पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. हल्ला इतका अचूक आणि भयानक होता की घरातील सर्व सदस्य जागीच ठार झाले.
युद्धविरामाच्या काही तास आधी हल्ला
२४ जून रोजी युद्धविराम जाहीर करण्यात आला होता, परंतु हा हल्ला त्या दिवसाच्या काही तास आधी करण्यात आला होता. म्हणजेच, शांततेच्या घोषणेपूर्वीच इस्रायलने शेवटचा मोठा हल्ला केला होता. इराणी माध्यमांचे म्हणणे आहे की या हल्ल्याचा लष्करी गरजांशी काहीही संबंध नव्हता किंवा तो केवळ शास्त्रज्ञावर केंद्रित नव्हता, तर तो सामूहिक हत्याकांडा सारखा होता.
इस्रायलच्या रणनीतीवर प्रश्न
या हल्ल्यानंतर, इस्रायलच्या लष्करी धोरणावर आणि सर्जिकल स्ट्राइकच्या दाव्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे हल्ले खरोखरच दहशतवाद आणि अणुधोका रोखण्यासाठी होते का, की त्यात जाणूनबुजून निष्पाप लोकांच्या जीवाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते? इराणने या हल्ल्यांचे वर्णन युद्ध गुन्हे म्हणून केले आहे आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.





