जळगावमध्ये पाणीपुरीतून 100 जणांना विषबाधा

जळगाव : आठवडे बाजार म्हणजे ग्रामस्थांच्यादृष्टीने जणूकाही जत्राच असते. चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे भरलेल्या आठवडे बाजारात चांदसणी, पिंप्री, मितावली यांसह आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थ खरेदीसाठी येत असतात. यावेळी बाजारात ग्रामस्थांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला. काही ग्रामस्थांना पाणीपुरी इतकी आवडली की त्यांनी ती घरीही नेली. पाणीपुरीवर यथेच्छ ताव मारल्यानंतर मात्र त्यांनी विषबाधा झाल्याचा प्रकार घडला.
मंगळवारी पाणीपुरी खाणाऱ्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखी असा त्रास जाणवू लागला. सायंकाळी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालयांसह अडावद येथील ग्रामीण रुग्णालयात विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच गेली. रुग्णांची गर्दी वाढल्यामुळे अडावदच्या रुग्णालयाला तर यात्रेचे स्वरूप आले. यामुळे तेथील वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचार्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
तेथे खासगी डॉक्टरांनीही मदतीसाठी धाव घेतली. तेथे ३० रुग्णांनी उपचार घेतले. रात्री उशिरा १०० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते. इतर रुग्णांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात, तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.





