“रत्नागिरी’दर्जानुसार 200 ते 500 रुपये भावाने
250 ते 400 रुपये भावाने “कर्नाटक’ उपलब्ध
पुणे – फळांचा राजा असलेल्या आणि खवय्यांचा लाडका असलेला हापूस आंब्याची मार्केट यार्डातील फळविभागात होणारी आवक घटली आहे. तरीही आंब्याचे गेल्या आठवड्यात उतरलेले भाव कायम आहेत. रत्नागिरीच्या तयार आंब्याला घाऊक बाजारात दर्जानुसार प्रती डझन 200 ते 450 रुपये भाव मिळत आहे. तर, दर्जानुसार 250 ते 400 रुपये डझन भावाने कर्नाटक हापूसची विक्री होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रत्नागिरी आंब्याविषयी व्यापारी युवराज काची आणि अरविंद मोरे म्हणाले, “मागील आठवड्याच्या तुलनेत आंब्याची आवक घटली आहे. रविवारी (दि.19) येथील बाजारात 4 ते 5 हजार जुडी आवक झाली. जी गेल्या आठवड्यात सात ते आठ हजार रुपये होती. जरी आवक घटली असली, तरीही भाव स्थिर आहेत. उत्तम दर्जाचा तयार आंबा बाजारात उपलब्ध आहे. कोकणातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंब्याची आवक होत आहे.’
तर, कर्नाटक हापूसविषयी व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, “कर्नाटक हापूसची आवक घटली आहे. रविवारी (दि. 19) 15 ते 16 हजार पेटी आवक झाली आहे. जी मागील आठवड्यात 18 ते 20 हजार पेटी होती. तरीही दर्जानुसार 250 ते 400 रुपये डझन प्रमाणे हापूस बाजारात उपलब्ध आहे. मात्र, आणखी आवक घटल्यास भावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.’