पर्वती मतदारसंघातील नागरिकांची होतेय गैरसोय
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील अन्नधान्य परिमंडळ ” ह’ चे वारंवार स्थलांतर करण्यात येत आहे. त्यामुळे हे कार्यालय नेमके कुठे आहे याची माहीतीच नागरिकांना नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत असून तातडीनं हे कार्यालय पर्वती विधानसभा मतदारसंघात पुन्हा सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय ही कार्यालये आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्यालय पूर्वी आंबिलओढा कॉलनी येथे होते. त्यानंतर ते शिवाजीनगर येथील धान्य गोदामात स्थलांतरीत करण्यात आले. तर आता धान्यगोदामाच्या कार्यालयाची जागा मेट्रोला देण्यात आली असल्याने हे कार्यालय आता जुन्या जिल्हा परिषद कार्यालयात स्थलांतरीत करण्यात आले. मात्र, त्याची माहिती कोठेही उपलब्ध नाही. या शिवाय, कार्यालयाच्या ठिकाणी गेल्यावर नागरिकांना माहिती नसल्याने एजंटच्या विळख्याचा त्रासही सहन करावा लागतो.
तसेच कामे नियमित होत नसल्याने हेलपाटेही घालावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन पक्षाकडून तातडीनं मतदारसंघात कार्यालय सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचे निवेदन नुकतेच अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे , निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांना देण्यात आले आहे. तसेच पर्वती मतदारसंघात हे कार्यालय सुरू करण्यासाठी असलेल्या जागांची यादीही देण्यात आली असल्याची माहिती कदम यांनी दिली. राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष वैजनाथ वाघमारे सरचिटणीस ,बाप्पू धुमाळ, पर्वती विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष प्रमोद कोठावळे,संतोष वचने ,अभिजीत उंद्रे उपस्थित होते.