दुचाकीच्या नंबरप्लेटवर चिखल लावून फिरणाºया दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडे तपास करीत चोरीच्या गुन्ह्यातील अडीच लाखांच्या ९ दुचाक्या जप्त केल्या आहेत. शंभु राजेंद्र खवळे (वय ३०,रा.वैदुवाडी, हडपसर) आणि निलेश मिटू कदम (वय १९, रा. थेउरगाव, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
कात्रज परिसरातील तलावाजवळ दोन युवक दुचाकीवर फिरत असून त्यांच्याजवळील दुचाकी चोरीची असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी गणेश चिंचकर आणि अभिजित जाधव यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी खवळे आणि कदम यांना ताब्यात घेतले. दुचाकीच्या नंबरप्लेटवर चिखल लागल्याने क्रमांक स्पष्ट दिसून येत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीबाबत चौकशी असता दोघेही उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. दरम्यान, दुचाकीच्या क्रमांकावरून माहिती काढली असता ती चोरी झाल्याची माहिती उघडकीस आली.
पथकाने दोघांना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाणे ५, शिवाजीनगर १, लोणीकाळभोर २, यवत १ अशा एकुण ९ दुचाक्या जप्त केल्या. त्यापैकी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल एक दुचाकी वाहनचोरीच्या गुन्हा भानुदास धोत्रे (वय ४०, रा. खंडाळा जि. सातारा) आणि सुनिल जाधव (रा. वाजेघर ता. वेल्हा) यांनी केला असल्याची माहिती दिली. सदर दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. उपनिरीक्षक सुबराव लाड, पोलीस कर्मचारी कृष्णा बढे, अभिजित रत्नपारखी, कुंदन शिंदे, महेश मंडलिक, सर्फराज देशमुख, राहुल तांबे, सचिन पवार आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.