ZP election : उजनी पट्ट्याचे राजकारण तापले! आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष, कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
वडापुरी – वडापुरी-माळवाडी या जिल्हा परिषद गटात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या जोरदार चर्चेने वातावरण ढवळून निघाले आहे. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नसतानाही गावोगावी मतदारांमध्ये आणि संभाव्य उमेदवारांमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून, उजनी पट्टा व भीमा नदीच्या खोर्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना समान संधी असलेल्या या गटात भाजपचे प्रवीण माने हे किंगमेकरचे भूमिका पार पाडतील.
उद्या होणार्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष आहे यानंतर अधिक स्पष्टता येणार आहे. या नव्याने तयार झालेला जिल्हा परिषद गटात आरक्षण सर्वसाधारण किंवा ओबीसी प्रवर्गासाठी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे, या गटात मराठा व धनगर समाजाचे जास्त प्राबल्य असल्याने उमेदवार निवडताना नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून माळवाडी गणात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वर्चस्व दिसून येत असून वडापुरी गणात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व आहे.
याशिवाये भारतीय जनता पक्षाचे युवा नेते व इंदापूर विधानसभेचे तत्कालीन अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असलेल्या या जिल्हा परिषद गटात दोन्ही राष्ट्रवादी व भाजपकडे इच्छुकांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. यापूर्वी 2017 साली झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण माने यांनी जिल्हा परिषदेसाठी नेतृत्व केले आहे ते जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती होते.
तर माळवाडी भागातून हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थक असलेल्या पुष्पा रेडके यांनी पंचायत समितीवर प्रतिनिधित्व केले आहे. रेडके यांनी सव्वा वर्ष इंदापूर पंचायत समितीचे सभापती म्हणूनही काम पाहिले आहे. वडापुरी गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पांढरे यांनी पंचायत समितीसाठी तर अभिजीत तांबिले यांनी जिल्हा परिषदेसाठी सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
आरक्षण सोडतीनंतर उमेदवारीची अधिक स्पष्टता येणार असली तरी या गटात सर्वाधिक इच्छुक पाहायला मिळत आहेत. दोन्ही राष्ट्रवादीसोबतच या गटात भारतीय जनता पक्ष ही उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाचे (पूर्व मंडल) तालुका अध्यक्ष राम आसबे या गटातून येतात, त्यामुळे तिरंगी लढत या गटात पाहायला मिळणार आहे.





