Yugendra Pawar । Markadwadi : राज्याच्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठे यश मिळाले. या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. अनेक दिग्गज नेते मंडळींना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर विरोधकांकडून ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला जात आहे. अनेक ठिकाणी आंदोलने देखील केली जात आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. मात्र प्रशासनाकडून ही मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी शरद पवारांनी मारकडवाडीला भेट दिली होती. त्यांनी स्थानिक नागरिकांनी ईव्हीएम विरोधी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. सत्ताधारी आणि विरोधक गेल्या दोन दिवसांपासून मारकडवाडीला भेट देत सभा घेताना दिसताय. नंतर काल महायुतीच्या नेत्यांनी याठिकाणी सभा घेतली. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. तसेच जयंत पाटील, रोहित पवारांसह सुप्रिया सुळेंवरही हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात युगेंद्र पवार यांना सवाल केला असता त्यांनी प्रत्युत्तर देताना आपले काका आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलंच सुनावल्याचे पाहायला मिळाले. गोपीचंद पडळकर काय बोलले मी ऐकलं नाही, असं म्हणत शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले आहे. युगेंद्र पवार पुढे नाव न घेता असेही म्हणाले, त्यांच्याकडून आम्ही वेगळं काही अपेक्षित करत नाही. वाईट याचं वाटतं कारण ते महायुतीत आहेत. महायुतीत राष्ट्रवादी पक्ष देखील आहे. त्यांनी यावर आक्षेप घेतला पाहिजे. कारण शरद पवार हे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि मोठे नेते आहेत. राज्यातील आणि देशातील लोक त्यांचा आदर करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले होते….. गोपीचंद पडळकर म्हणाले की, “ईव्हीएमला विरोधी करून बॅलेट पेपेरवर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या आणि त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शरद पवारांना आमचे आवाहन आहे की. शरद पवारांनी सर्वप्रथम आपल्या लेकीचा, आपल्या नातवाचा तसेच जयंत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या तिघांचा पहिल्यांदा राजीनामा घेऊन त्यानंतर हे आंदोलन पुढे नेले पाहिजे. तसेच काँग्रेसच्या राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनीही राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. अन्यथा EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, असे म्हणत पडळकरांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांचे सर्व राजकारण विश्वासघातावर अवलंबून होते. त्यांची अक्कल देखील या आंदोलनात संपल्याचे दिसते. 2017 ते 2024 पर्यंत एकानेही मशीनमध्ये कसा घोटाळा होतो ते दाखवू शकले नाहीत. जयंत पाटील यांनी हे सिद्ध केले तर लायकी नुसार 101 रुपयाचे बक्षीस आणि दुसऱ्या कोणीही हॅक करून दाखवल्यास 11 लाखाचे बक्षीस देऊ असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.