Youth Drug Addiction – शिक्षण, इतिहास आणि सांस्कृतिक परंपरेसाठी ओळखल्या जाणार्या मावळ तालुक्यात सध्या तरुण पिढीमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. करिअरच्या उंबरठ्यावर असलेली अनेक तरुणाई विविध व्यसनांच्या आहारी जात असून, यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण होत आहे. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये मद्य, तंबाखू, गुटखा तसेच अंमली पदार्थांचे सेवन वाढल्याचे दिसून येत आहे. विशेषतः अल्पवयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याची बाब गंभीर मानली जात आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी टोळक्याने एकत्र येऊन माळरान, ओसाड जागा किंवा अंधाराच्या आड व्यसन करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या वाढत्या व्यसनाधीनतेमागे अनेक कारणे पुढे येत आहेत. मित्रपरिवाराचा दबाव, सोशल मीडियाचा प्रभाव, आधुनिक जीवनशैलीतील ताणतणाव, बेरोजगारी आणि दिशाहीनता यामुळे अनेक तरुण व्यसनाकडे आकर्षित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अमली पदार्थ कारवाई(संग्रहित फोटो) काही वेळा केवळ कुतूहल किंवा मित्रांच्या प्रभावामुळे सुरू झालेले व्यसन पुढे गंभीर सवय बनत असल्याचेही दिसून येते. या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि स्थानिक प्रशासन यांनी संयुक्तपणे व्यसनमुक्तीबाबत जनजागृती मोहिमा राबविण्याची गरज अधोरेखित होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणे, तसेच क्रीडा, सांस्कृतिक आणि सकारात्मक उपक्रमांकडे त्यांना वळवणे आवश्यक मानले जात आहे. पालकांनीही आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मुलांच्या वर्तनातील बदल ओळखून वेळेत उपाययोजना केल्यास व्यसनाधीनतेपासून त्यांना दूर ठेवता येऊ शकते. तरुणांनी स्वतःही या समस्येची जाणीव ठेवून सकारात्मक जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे. तालुक्यात वाढत असलेली ही व्यसनाधीनतेची समस्या केवळ आरोग्यापुरती मर्यादित नसून सामाजिक आणि आर्थिक परिणाम घडवणारी आहे. त्यामुळे या समस्येवर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होत आहे. तरुणांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम शारीरिक अशक्तपणा, मानसिक तणाव, चिडचिडेपणा, एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्या वाढत आहेत. याशिवाय व्यसनाच्या आहारी गेलेल्या काही तरुणांमध्ये गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाणही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक स्तरावरही या समस्येचे गांभीर्य वाढत आहे. कुटुंब व्यवस्थेमधील बदल कारणीभूत विभक्त कुटुंबांमध्ये वाढणार्या मुलांना भावनिक आधार कमी मिळतो. पालकांमधील दुरावा किंवा तणावामुळे मुलांमध्ये एकटेपणा आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. अशा परिस्थितीत काही तरुण चुकीच्या सवयींकडे वळतात. कुटुंबातील नियंत्रण आणि मार्गदर्शन कमी झाल्यास मित्रपरिवाराचा प्रभाव अधिक वाढतो आणि त्यातून व्यसनाधीनतेची शक्यता वाढते.