‘अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमोर उभे राहताच तुमची 56 इंचाची छाती 36 इंचावर येते’, कल्याण बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना प्रश्न

नवी दिल्ली: लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेची सुरुवात करताना सांगितले की, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी तात्काळ कारवाई करत नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले, ज्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. मात्र, यावेळी विरोधी पक्षातील काँग्रेस खासदार गौरव गोगोई आणि टीएमसी खासदार कल्याण बनर्जी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. कल्याण बनर्जी यांनी बंगाली भाषेत बोलताना सरकार आणि सुरक्षा यंत्रणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
कल्याण बनर्जी यांचा सरकारवर हल्ला-
टीएमसी खासदार कल्याण बनर्जी यांनी तीव्र शब्दांत सरकारला लक्ष्य केले. ते म्हणाले, “आम्हाला वाटले होते की आपण युद्ध जिंकू आणि पाकिस्तानला धडा शिकवू. मग युद्धविरामाची घोषणा का केली? खेळाडू शतकाच्या उंबरठ्यावर असताना पारी घोषित करतात का? यांनी तसेच केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, त्यांच्या मध्यस्थीमुळे युद्धविराम झाला. जर हे चुकीचे असेल, तर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर हे खोटे असल्याचे का सांगितले नाही? अमेरिकेच्या दबावाखाली युद्धविराम का जाहीर केला?”
‘मोदींची उंची ५ फूट कमी होते’-
पंतप्रधान मोदींवर थेट हल्ला चढवताना बनर्जी म्हणाले, “पंतप्रधान मोदी, तुम्ही तुमच्या ‘एक्स’ हँडलवर ट्रम्प यांचे वक्तव्य खोटे असल्याचे का लिहिले नाही? जेव्हा तुम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमोर उभे राहता, तेव्हा तुमची उंची ५ फूट कमी होते आणि तुमची ५६ इंचाची छाती ३६ इंचावर येते. तुम्हाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची इतकी भीती का वाटते?”
सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह –
बनर्जी यांनी सुरक्षा यंत्रणांच्या अपयशावरही बोट ठेवले. ते म्हणाले, “चार दहशतवादी तिथे कसे आले? चार सशस्त्र दहशतवाद्यांनी येऊन २६ लोकांचा जीव घेतला. आपले सैनिक कुठे होते? बीएसएफ, सीआयएसएफ काय करत होते? गृहमंत्री अमित शाह कुठे होते? बीएसएफ आणि सीआयएसएफच्या अपयशामुळे २६ जणांचा बळी गेला. इतकेच नाही, तर हे दहशतवादी २६ जणांचा जीव घेऊन निवांतपणे पाकिस्तानात परत गेले आणि आपल्या सुरक्षा यंत्रणा हातावर हात ठेवून बसल्या.”
‘गृहमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी’
बनर्जी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “अमित शाह गेले कुठे? इतके बेजबाबदार गृहमंत्रालय यापूर्वी कोणी पाहिले नाही. याची जबाबदारी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी घ्यायला हवी. १४० कोटी भारतीयांसमोर हात जोडून त्यांनी मान्य करायला हवे की, त्यांच्या निष्काळजीपणामुळे २६ जणांचा बळी गेला.” त्यांनी पुढे म्हटले, “हे लोक एकाही दहशतवाद्याचा शोध घेऊ शकले नाहीत, आणि बोलतात की १०० दहशतवादी मारले. त्या चार दहशतवाद्यांचे नाव तरी सांगा!”
या चर्चेदरम्यान लोकसभेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. बनर्जी यांच्या टीकेने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर सरकारने आपली बाजू मांडताना विरोधकांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.





