“अलिबागचे जावई आहात जावयासारखे या; उन्माद करु नका अन्यथा…”; शिवसेनेचा सोमय्यांना इशारा

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या ठाकरे कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप करत शुक्रवारी कोर्लई गावात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार होऊ न देण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून किरीट सोमय्या यांना अलिबागचे जावई आहात जावयासारखे या असे म्हणत थेट इशाराच दिला आहे.
कोर्लई येथील रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या जागेवरील १९ बंगल्यांचा शोध घेण्यासाठी किरीट सोमय्या कोर्लई गावात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी रायगड जिल्हा भाजपाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. पेण, पेझारी आणि अलिबाग येथे त्यांचे स्वागत केले जाणार आहे. यानंतर ते सुरवातीला कोर्लई ग्रामपंचायतीला भेट देणार आहेत. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन यापूर्वी केलेल्या तक्रारींबाबत पोलीस प्रशासनाकडे विचारणा करणार आहेत. संध्याकाळी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस ठाण्याने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे वाढीव बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार जादा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात ठेवला जाणार आहे.
“सोमय्या हे अलिबागचे जावई आहेत, त्यांनी जावयासारखे यावे. उन्माद करू नये अन्यथा शिवसेना योग्य उत्तर देईल,” असा इशारा शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. कोर्लई गावच्या सरपंचानी कालच वस्तुस्थिती सांगितली आहे. त्यामुळे सोमय्यांनी उगाच खोटेनाटे आरोप करू नयेत असही त्यांनी म्हटले आहे.





