लखनौ : राजकारणाला पार्टटाईम मानणाऱ्यांनी या क्षेत्रात राहूच नये. खरे राजकारण हे सेवा करण्याचे क्षेत्र आहे. त्यासाठी दिवसाचे २४ तास आणि संपूर्ण आयुष्य याबाबीही अपुऱ्या पडतात, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेचा समाचार घेतला. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत योगींनी राजकारण हा माझा पूर्णवेळचा व्यवसाय नसल्याचे म्हटले. मी मनाने योगी आहे. उत्तरप्रदेशातील जनतेची सेवा करण्यासाठी मी मुख्यमंत्रिपद भुषवत आहे. माझ्या पक्षाने (भाजप) दिलेली जबाबदारी मी सांभाळत आहे, असे भाष्य त्यांनी केले. त्यावर अखिलेश यांनी प्रतिक्रिया दिली. वक्फ मंडळ, रस्त्यांवर नमाज पठण आदी मुद्द्यांवरही योगींनी त्यांची मतं मांडली. मात्र, त्यासंबंधी बोलून योगी अपयश दडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. भाजपने निवडणुकांवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे मतदार त्या पक्षापासून दूर जाऊ लागला आहे. भाजपच्या नेत्यांची महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर बोलण्याची इच्छा नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाचे काय झाले याविषयी बोलण्याचेही ते टाळत आहेत. अपयश झाकण्यासाठी भाजपचे नेते इतर मुद्दे पुढे करत आहेत, असाही दावा त्यांनी केला.