कराड: सातारा जिल्ह्यातील फलटण येथील यशवंत सहकारी बँकेतील तब्बल ११२ कोटी १० लाख ५७ हजार रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना आज पहाटे अटक करण्यात आली. कराड न्यायालयाने त्यांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Yashwant Bank scam) पहाटेच्या सुमारास कारवाई – आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक इनामदार यांच्या पथकाने आज (२५ फेब्रुवारी) पहाटे चरेगांवकर यांच्या निवासस्थानी धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले. या घोटाळ्याप्रकरणी चरेगांवकर यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक अशा एकूण ५० जणांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. १९५ बोगस खात्यांद्वारे अपहार – तपासातील प्राथमिक माहितीनुसार, २०१४ ते २०२५ या प्रदीर्घ कालावधीत हा गैरव्यवहार झाला आहे. यात सुमारे १९५ बोगस कर्ज खाती उघडण्यात आली होती. कोणत्याही प्रकारचे तारण न घेता आणि केवळ बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचे वाटप करून बँकेची फसवणूक करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हेही वाचा: अनिल अंबानींना मोठा झटका; EDकडून 3716 कोटींचे ‘अबोड’ निवासस्थान जप्त ईडीची कारवाई – या प्रकरणाचे गांभीर्य पाहून याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२५ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या विविध शाखांसह चरेगांवकर यांच्या नातेवाईकांच्या घरांवर छापेमारी केली होती. चरेगांवकर यांनी यापूर्वी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. न्यायालयात काय झाले? आज चरेगांवकर यांना कराड येथील पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जितेंद्र जाधव यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाच्या युक्तिवादात महत्वाचे मुद्दे मांडले. गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या घोटाळ्याचा सखोल तपास करण्यासाठी आणि चरेगांवकर यांच्या सहभागाची व्याप्ती शोधण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस कोठडीची गरज आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शेखर चरेगांवकर यांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या अटकेमुळे सहकार क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.