Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियाला मोठ्या विजयाची आवश्यकता, श्रीलंकेविरुद्ध आज ‘करो या मरो’ची लढत…

Women’s T20 World Cup 2024 (IND vs SL) : – फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघाला पहिल्या महिला टी-20 विश्वकरंडक लढतीत न्यूझीलंड संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या लढतीत देखील धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ढेपाळले असले तरी भारताने कसाबसा विजय मिळविला होता. याचा परिमाण जिंकून देखील भारताला नेटरनरेट मध्ये मोठा फटका बसला. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या श्रीलंकेबरोबरच्या लढतीमध्ये भारताला मोठ्या विजयासह रनरेट देखील कशा प्रकारे वाढविता येईल, याप्रमाणेच खेळावे लागणार आहे.
भारतीय महिला संघाला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. कर्णधार सोफी डिव्हाईन नेतृत्व करत असलेल्या न्यूझीलंड संघाकडून भारताला 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या लढतीत पारंपरिक स्पर्धक असलेल्या पाकिस्तान संघाने दिलेले 106 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी भारताला 18.5 षटकांपर्यंत वाट पहावी लागली. विश्वकरंडक स्पर्धेत फलंदाजी ही भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे.
शेफाली वर्मा व स्मृती मंधाना या दोन्ही सलामीवीरांना अजूनही चांगली सुरुवात करून देता आलेली नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये शेफालीने 2 व 32 तर स्मृती मंधानाने 12 व 7 धावा केल्या आहेत. दोघी देखील झटपट बाद होत असल्याने मधल्या फळीतील फलंदाजांवर मोठ्या प्रमाणात दडपण येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दोन्ही सलामीवीरांना संघासाठी चांगली सुरुवात करून द्यावीच लागणार आहे.
दुखापतग्रस्त कर्णधार खेळणार का ?
पहिल्या सामन्यामध्ये 15 व दुसऱ्या सामन्यामध्ये 29 धावा करणारी कर्णधार हरमनप्रीत कौरला मानेची दुखापत झाली आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या श्रीलंकेच्या लढतीमध्ये खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये फलंदाजी करताना हरमनप्रीतला दुखापत झाल्याने तिला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले होते. त्यामुळे जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांच्यावर फलंदाजीचा अधिक भार पडणार आहे. भारताच्या अरुंधती रेड्डीने 19 धावांच्या मोबदल्यात पाकिस्तानचे 3 गडी बाद केले होते. मात्र, तिला रेणुका सिंग व पूजा वस्त्राकार यांच्याकडून हवी तशी साथ मिळाली नाही.
Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियानं पुन्हा मारलं मैदान, पाकचा 6 विकेट्स राखून केला पराभव…
दीप्तीवर ‘फिरकी’ अवलंबून…
भारतीय संघ फिरकी गोलंदाजीसाठी दीप्ती शर्मावर अवलंबून आहे. मात्र अजूनही तिला म्हणावा तसा सूर मिळालेला नाही. युवा ऑफस्पिनर श्रेयांका पाटील व लेगस्पिनर आशा शोभना यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. बुधवारच्या लढतीमध्ये भारताला दमदार कामगिरी करून आगेकूच करावी लागणार आहे. शेवटच्या साखळी लढतीत ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान असणार आहे.
रनरेट महत्वाचा
श्रीलंका संघ पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाला असला तरी त्याला कमकुवत समजणे चुकीचे ठरणार आहे. श्रीलंका संघाने ऑगस्ट महिन्यात झालेल्या आशियाई करंडक स्पर्धेच्य अंतिम लढतीत भारताला पराभूत केले होते. त्यामुळे या लढतीत भारताला सावध खेळताना मोठा विजय साकारावा लागणार आहे, ज्यामुळे भारताचा नेट रनरेटमध्ये सुधारणा होईल. संघ खालीलप्रमाणे आहेत.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टिरक्षक), यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, संजना संजीवन.
श्रीलंका : विशामी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, अनुष्का संजीवनी (यष्टिरक्षक ), नीलाक्षिका सिल्वा, चामारी अटापट्टू (कर्णधार), कविशा दिलहारी, अमा कांचना, इनोशी प्रियदर्शिनी, शशिनी गिम्हनी, अचीनी कुलसूरिया, एस. कुमारी, साचिनी निसानसाला, उदेशिका प्रबोधिनी, इनोका रणवीरा.





