Women Take pills to postpone periods: सण-समारंभ, पूजा किंवा प्रवासाच्या योजनांमध्ये मासिक पाळी अडथळा ठरते म्हणून अनेक स्त्रिया पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या घेतात. मेडिकलमधून सहज उपलब्ध होणाऱ्या या गोळ्या अनेक महिला डॉक्टरांचा सल्ला न घेता घेतात. मात्र, हा सर्रास वापर महिलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. सण-समारंभात ‘विटाळ’ची भीती घरात गणपती, गौरी किंवा सत्यनारायणासारखे धार्मिक कार्यक्रम असतील आणि त्या काळात मासिक पाळी आली तर महिलांना अनेकदा बाजूला बसवले जाते. पाळी आली म्हणजे ‘विटाळ’ मानला जातो, ही आजही खोलवर रुजलेली सामाजिक मानसिकता आहे. या दबावातून बाहेर पडण्यासाठी किंवा कुटुंबातील परंपरेचा भंग होऊ नये म्हणून अनेक महिला पाळी थांबवण्याच्या गोळ्यांचा आधार घेतात. तज्ज्ञांचा इशारा स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते, पाळी हा स्त्रीच्या शरीराचा नैसर्गिक जैविक धर्म आहे. त्यात विटाळ नाही. पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या सतत घेतल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. यामुळे अनियमित पाळी, लठ्ठपणा, त्वचेवरचे विकार, गर्भधारणेतील अडचणी आणि दीर्घकाळ गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.गोळ्या वारंवार किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता घेतल्यास खालील गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात : १) हार्मोनल असंतुलन शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन यांचे प्रमाण बदलते. पाळी अनियमित होऊ शकते किंवा पूर्णपणे थांबू शकते. २) मासिक पाळीशी संबंधित समस्या पुढील पाळी वेदनादायी होऊ शकते. अनियमित रक्तस्राव किंवा स्पॉटिंग सुरू राहू शकते. दीर्घकाळ पाळी न आल्याने गर्भाशयावर ताण येतो. ३) गर्भधारणेवर परिणाम दीर्घकाळ गोळ्या घेतल्यास भविष्यात गर्भधारणा होण्यास अडथळे येऊ शकतात. गर्भाशयाचे आरोग्य कमजोर होऊ शकते. ४) शारीरिक दुष्परिणाम डोकेदुखी, मळमळ, वजन वाढ, चेहऱ्यावर पिंपल्स येणे. रक्तदाब वाढणे, चिडचिड, थकवा जाणवणे. रक्ताच्या गाठी (blood clots) होण्याचा धोका. ५) दीर्घकालीन आजारांचा धोका हार्मोनल असंतुलनामुळे पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOS) होऊ शकतो. हाडांची घनता कमी होऊन ऑस्टिओपोरोसिसचा धोका. हार्ट डिसीज आणि लिव्हरशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता. समाजातील गैरसमज ‘पाळी आली की पूजा करता येत नाही’ हा गैरसमज आजही समाजात घट्ट बसलेला आहे. मात्र, यामुळे महिलांना मानसिक तणाव आणि आत्मसन्मानाला धक्का बसतो. काही दिवसांपूर्वी अशाच विटाळाच्या कल्पनेमुळे अवघ्या १८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता, हे धक्कादायक वास्तव आहे. बदलाची गरज तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मासिक पाळीबद्दल उघडपणे बोलले गेले पाहिजे आणि जुनाट गैरसमजांना छेद दिला पाहिजे. पाळीमुळे धार्मिक कार्यात सहभागी होणे चुकीचे मानणे ही केवळ अंधश्रद्धा आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याचा विचार करूनच निर्णय घ्यावा आणि औषधे घेण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पाळी हा नैसर्गिक आणि आरोग्यासाठी आवश्यक शारीरिक बदल आहे. त्याला ‘विटाळ’ मानणे किंवा पाळी पुढे ढकलण्यासाठी आरोग्याशी खेळ करणे हा उपाय नसून, समाजाने विचारसरणीत बदल करण्याची गरज आहे.