मुंबई : राज्यात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागली आहे. मात्र, या युतीवरून मनसे नेत्यांमध्ये काहीसे नाराजीचे वारे वाहू लागल्याचे दिसून येत आहे. आज (रविवारी) मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यावर भाष्य केले आहे. तसेच संपूर्ण मराठी माणसांनी एकत्र यायला हवे. फक्त ठाकरे बंधूच का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
संदीप देशपांडे म्हणाले, युतीचा विषय केवळ निवडणुकीपुरता नाही. आता कोणती निवडणूक आहे? जेव्हा निवडणुका येतील तेव्हा निवडणुकीचा विचार करु. आता विषय हिंदी सक्तीचा विषय आहे. परप्रातींयांचा विषय आहे. बँकांमध्ये मराठीचा वापर होत नाही, तो विषय आहे. त्यावर महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हिंदीच्या आंदोलनास पाठिंबा दिला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
भाजपने कोण हिंदुत्ववादी कोण नाही, हे प्रमाणपत्र देऊ नये. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे यांनीही कोण महाराष्ट्रद्रोही आहे, असे प्रमाणपत्र कोणाला देऊ नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसे सैनिकांवर १७ हजार गुन्हे दाखल झाले होते. ती चूक उद्धव ठाकरे यांना वाटते का? ते त्याबद्दल मनसेची माफी मागणार का?, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
कावेरीसाठी तामिळनाडूतील पक्षातील एकत्र येतात, मग आपण का नाही? महाराष्ट्रात सर्वांनी एकत्र यावे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी त्या मुलाखतीत मांडली. राज ठाकरे यांची संपूर्ण मुलाखत युती एवढी संकुचित नाही. त्यात अनेक विचार आहेत. मराठी माणसांचे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रश्न आहेत. निवडणूक आल्यावर तू ही लढ, मी ही लढतो, एवढा संकुचित विचार राज साहेबांनी मांडला नाही, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.