मुंबई : येत्या दसरा मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील राजकीय जवळीकतेचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना यंदाच्या दसरा मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांना शिवतीर्थावर स्टेजवर आमंत्रित करण्याचे संकेत दिले आहेत. ही केवळ दोन पक्षांची गरज नसून, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दसरा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ स्वरूपाचा सचिन अहिर म्हणाले, “गणपतीनंतर पितृपक्ष सुरू होत आहे, पण दसऱ्याला चांगली बातमी मिळेल,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. शिवसेनेचा दसरा मेळावा हा राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून नेहमीच महत्त्वाचा मानला जातो. यंदा हा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ स्वरूपाचा असेल, असे संकेत अहिर यांनी दिले. “राज ठाकरे यांना आमच्या मेळाव्याचे निमंत्रण देण्याची शक्यता आहे. त्यांचाही दसरा मेळावा असतो, त्यामुळे ते आम्हाला आमंत्रित करू शकतात,” असे त्यांनी सांगितले. यामुळे उद्धव आणि राज ठाकरे स्टेजवर एकत्र दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं गरजेचं मुंबईच्या बदलत्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना सचिन अहिर म्हणाले, “मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ही केवळ पक्षाची नव्हे, तर जनतेच्या मनातील भावना आहे.” मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक मराठी माणसासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार असल्याचे सचिन अहिर यांनी नमूद केले. पुढे बोलताना म्हणाले, “मी १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत होतो, पण शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच मुंबई चांगली चालू शकते, असं मला नेहमी वाटायचं. आता मुंबईचं स्वरूप बदलत आहे. त्यामुळे मराठी माणूस टिकवायचा असेल, तर ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन नेतृत्व करणं ही काळाची गरज आहे,” असे अहिर यांनी ठामपणे सांगितले. ठाकरे बंधूंची जवळीक, राजकीय गणित बदलणार? उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील राजकीय दुरावा गेल्या काही वर्षांत चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र, आता दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद वाढवल्याचे संकेत मिळत आहेत. सचिन अहिर यांनी दिलेल्या वक्तव्यातून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची शक्यता अधिक दृढ झाली आहे. यंदाचा दसरा मेळावा केवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिशा देणारा नसून, महाराष्ट्राच्या राजकारणात नवं पर्व सुरू करणारा ठरू शकतो.