प्रभात वृत्तसेवा पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दि. ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे बंधन आहे. त्यामुळे आचारसंहितेची अडचण येऊ नये म्हणून हिवाळी अधिवेशन सुटी न घेता सलग ९ दिवस चालणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन-तीन आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. विरोधकांनी याला संमती देऊन स्वाक्षरी केली, मात्र बाहेर येऊन ते वेगळी भूमिका मांडत आहेत. विरोधकांचे हे वागणे योग्य नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी ईव्हीएम आणि स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेबाबत केलेले आरोप बावनकुळे यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, सांगली किंवा इतर ठिकाणी ईव्हीएम सुरक्षित आहेत. विरोधकांना आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे. केवळ कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी ते निवडणूक आयोगावर आणि यंत्रणेवर बिनबुडाचे आरोप करत आहेत.