“…तोपर्यंत युतीतून बाहेर पडणार नाही’, बच्चू कडूंनी घेतली शरद पवारांची भेट; नव्या राजकीय चर्चेला उधाण

अमरावती – जो पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही असे स्पष्ट विधान आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आहे.
यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बच्चू कडू महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र याबाबात स्वतः बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्यासोबतच्या भेट ही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. तसेच भेटी दरम्यान शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली असे कडू म्हणाले.
तसेच, सरकारवर टीका-टिप्पणी, नाराजी वगैरे सगळे करण्याची गरज नाही. आम्ही सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहोत. जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नसतील तर मग कदाचित आम्ही तसा निर्णय घेऊ, असेही कडू म्हणाले.
आमचा पक्ष आहे. पक्षाचे भले कुठे होत आहे, त्यानुसार विचार केला जाईल. जिथे राजकीय अस्तित्व मजबूत होईल, तो आमचा राजकीय सोबती असेल, असे सूचक विधानही बच्चू कडू यांनी केले आहे.
तसेच आम्ही एक-दोन जागेसाठी काही करणार नाही. केले तर तीन-चार जागा घेऊनच महाविकास आघाडीकडे जाण्याचा विचार करू, असेही बच्चू कडू म्हणाले.
…म्हणून भेट
१० वर्षांपूर्वी विदर्भ मिल बंद पडली आणि फिनले मिलचा विस्तार इतर ठिकाणी होणार होता. तेव्हा शरद पवार कृषीमंत्री होते. मी आणि आर. आर. आबा त्यांना भेटायला गेलो. तेव्हा शंकरसिंह वाघेला वस्त्रोद्योग मंत्री होते.
त्यांच्याशी शरद पवारांनी चर्चा केल्यामुळे ती मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली. त्याची जाणीव म्हणून आम्ही शरद पवारांना आमंत्रण दिले. त्यामुळे ते घरी चहापानासाठी येणार आहेत, असे बच्चू कडू यांनी भेटीमागचे कारणही स्पष्ट केले.





