मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती
सत्यजित देशमुख भाजपमध्ये
विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव व सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी कराड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
कराड –सध्या महाराष्ट्रात विक्रमी पाऊस पडत आहे. त्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जागतिक बॅंकेने असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे की, ज्यामुळे पूरनियंत्रण करता येते. जागतिक बॅंक आणि आशियाई विकास बॅंकेचे 22 तज्ज्ञांचे पथक महाराष्ट्रात आले होते. त्यांच्यापुढे आम्ही प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर “डिझास्टर प्रूफ इन्फ्रास्ट्रक्चर’ करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शरद पवार हे मोठे नेते आहेत. आपल्या वक्तव्याचा फायदा देशाला होईल की, पाकिस्तानला होईल, याचा विचार त्यांनी बोलताना करणे गरजेचे आहे. राहूल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमध्येही असेच काहीसे वक्तव्य केल्याने पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतीय नेते आमच्यासोबत असल्याचे सांगितले होते. निवडणुकीत मते मिळवण्यासाठी देशविरोधी वक्तव्ये करणे चांगले नाही. भारतीय मुसलमान देशाविषयी अभिमान राखणारा आहे. पवारांनी पाकिस्तानचे कौतुक केले, म्हणून मुस्लिम लोक त्यांना मते देतील,राज्यात पूरस्थिती नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण नियोजन करणार असा विचार करणारी राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणत्या मानसिकतेत आहेत, हे समजते. अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
गेल्या 19 दिवसांपासून महाजनादेश यात्रेचा तिसऱ्या टप्पा सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे व सातारा जिल्ह्यांनंतर यात्रा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहे. आतापर्यंत तीन हजार 189 किलोमीटरचा प्रवास केला असून 112 विधानसभा मतदारसंघांमध्ये यात्रा गेली असून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काल म्हणाले होते की, महाराष्ट्र रोजगार निर्मितीत आठव्या क्रमांकावरून तेराव्या क्रमांकावर गेला. त्यांनी एक सत्य सांगितले की, त्यांच्या काळात महाराष्ट्र आठव्या क्रमाकांवर होता; परंतु आज महाराष्ट्रातील गुंतवणूक ही देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या 49 टक्के आहे. उदयनराजेंनी तीन महिन्यांत खासदारकीचा राजीनामा दिला, हा लोकशाहीचा खून असल्याचे ते म्हणतात.
लोकशाहीबद्दल बोलायचा कॉंग्रेसला अधिकार नाही. देशात लोकशाही पायदळी तुडवून आणीबाणी लादण्याचे काम कॉंग्रेसने केले होते. गेल्या 15 वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात किती लोकांचे राजीनामे घेतले गेले? त्याची सुरुवात 1992 पासून झाली होती. पहिल्यांदा छगन भुजबळ 12 आमदारांसोबत कॉंग्रेसमध्ये गेले, त्यानंतर नारायण राणे गेले. 70 वर्षानंतर एखादा पक्ष, नेता, पंतप्रधान 370 कलम रद्द करण्याची हिम्मत दाखवत असतील आणि भारताला एकसंध ठेवण्याचा निर्णय घेत असतील आणि त्याच वेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते 370 च्या बाजूने भाषणे करत असतील तर आमच्यासाठी देश प्रथम असून आम्ही अशा लोकांसोबत राहू शकत नाहीत, असे सांगून उदयनराजे आमच्यासोबत आले आहेत.
पृथ्वीराजबाबांना सांगावे की, तुम्ही 370 च्या बाजूचे की विरोधात आहात? काश्मीरमध्ये भारताच्या तिरंग्याला महत्व मिळावे की, काश्मीरच्या झेंड्याला मिळावे. देशात तुम्ही आरक्षणाच्या बाजूचे आणि काश्मीरमध्ये आरक्षणाच्या विरोधातले, अशी विसंगती आहे. देशातील कोणालाही काश्मीरमध्ये सुईच्या टोकाएवढी जमीन घेता येत नाही. लोकशाहीचा खून वगैरे काही नसून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता सातारा जिल्ह्यात त्यांचे अस्तित्व राहते की नाही, अशी शंका असल्याने ते टीका करत आहेत. सातारा जिल्ह्यात आम्ही मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे.