झारखंडमध्ये इंडिया आघाडी विखुरणार? राजद स्वतंत्रपणे लढण्याच्या पवित्र्यात

रांची : झारखंडमधील जागावाटपावरून लालूप्रसाद यादव यांच्या राजदची नाराजी कायम आहे. आता त्या पक्षाने प्रसंगी स्वतंत्रपणे लढण्याचा पवित्रा स्वीकारला आहे. राजद स्वबळावर लढल्यास त्या राज्यात इंडिया आघाडीत फाटाफूट होईल. विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या झारखंडमध्ये झामुमो, कॉंग्रेस, राजद आघाडीची सत्ता आहे.
ते तिन्ही पक्ष राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीचे घटक आहेत. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत. त्यातील ७० जागा लढवण्याची घोषणा झामुमो आणि कॉंग्रेस या पक्षांनी शनिवारी केली. त्या पक्षांचा समावेश असणाऱ्या आघाडीत डाव्या पक्षांचाही समावेश आहे. साहजिकच, राजद आणि डाव्या पक्षांना लढण्यासाठी उर्वरित ११ जागाच शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे झामुमो, कॉंग्रेसच्या घोषणेनंतर तातडीने राजदने तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर राजदने रविवारी स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले. झारखंडमधील १८ ते २० जागांवर राजदची स्थिती अतिशय मजबूत आहे. त्यामुळे आघाडीचा घटक म्हणून आम्हाला किमान १२ ते १३ जागा मिळायला हव्यात. कुठला त्याग आम्ही करणार नाही. केवळ ३ ते ४ जागांवर समाधान मानणार नाही, अशी भूमिका राजदचे नेते मनोजकुमार झा यांनी मांडली.
अर्थात, स्वतंत्र लढलो तरी इंडिया आघाडीला नुकसान पोहचवण्याची आमची इच्छा नाही. त्या आघाडीला आम्ही ६० ते ६२ जागांवर पाठिंबा देऊ. भाजपचा पराभव हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. त्यातून राजदने समझोत्याचा पर्याय खुला ठेवला असल्याचेही सूचित होत आहे. त्या पक्षाची मनधरणी झामुमो आणि कॉंग्रेस करणार का ते आगामी काळात स्पष्ट होईल.





