चंद्राबाबू नायडू किंगमेकर ठरणार का? निकाल लागल्यावर शरद पवारांनी कुणाला केला पहिला फोन, स्वतः सांगितलं….

Lok Sabha Result 2024 – लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल पुरेसे स्पष्ट झाल्यानंतर आणि आपल्याला स्वबळावर सरकार स्थापन करता येत नसल्याची जाणीव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी तेलगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्याशी दुपारच्या सुमारास फोनवर चर्चा केल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नायडू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या निमंत्रक पदाची ऑफर देण्यात आली आहे.
भाजपला बहुमत नाही आणि एनडीएलाही काठावरचे बहुमत मिळाले असल्यामुळे कॉंग्रेसकडूनही सरकार स्थापन करण्याची चाचपणी केली जाते आहे. पक्षाकडून नायडू यांच्याशी संपर्क साधण्यात आला असल्याचीही चर्चा होती. किंवा साधला जाऊ शकतो असेही सांगण्यात आले. याबाबत स्पष्टता नव्हती.
याची कुणकुण लागल्यामुळे नायडू यांनी एनडीएतून बाहेर न जाता आपल्याच सोबत राहावे यासाठी भाजपच्या दोन्ही बड्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याचे सांगण्यात आले. एकप्रकारे हीच स्थिती राहीली तरी नायडू पुन्हा किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत.
त्यांचे दिल्लीतील महत्व आता किमान पुढील पाच वर्षे तरी कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळाले आहे. नायडूंचा टीडीपी जर इंडिया आघाडीत सहभागी झाला तर भाजपला सरकार स्थापन करणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे आता नायडूंचा काय निर्णय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, अश्यातच देशातील राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “निकाल लागल्यावर काही सहकाऱ्यांशी चर्चा केली.
खर्गे, सीताराम येच्युरी आणि इतरांशी चर्चा केली. अजून नक्की नाही. उद्या दिल्लीत बैठकीत होणार असल्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत आम्हाला निरोप मिळेल. उद्याच्या बैठकीला तातडीने जाऊ. पुढची नीती आणि सामूहिकपणे घेऊ”, असं शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रात 30 जागांवर आघाडी
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 30 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आघाडी असल्याचे दिसून येते. तर, महायुतीच्या उमेदवारांना चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे. बहुतांश जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवारांना मोठी आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.





