“निवडणूक आयोग बरखास्त करुन तिथे संजय राऊतांना बसवायाचं का?; रावसाहेब दानवेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई : ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार हल्ला चढवत शिवसेनेसारखी परिस्थिती देशातील कोणत्याही पक्षावर लादू शकतात. आताच याचा मुकाबल नाही केल तर २०२४ ची निवडणूक शेवटची ठरेल. तसेच, निवडणूक आयोगाचा निर्णय अमान्य असून, तो देणारा आयोग बरखास्त करावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. त्यांच्या या मागणीवर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या मागणी उद्धव ठाकरेंनी केली, याविषयी बोलताना रावसाहेब दानवे यांनी, “निवडणूक आयोग बरखास्त करुन तिथे संजय राऊतांना बसवायाचं का? मोडतोड उद्धव ठाकरेंनी केली आहे. आमचं असलेलं उद्धव ठाकरेंनी मोडलं. मग, आम्ही त्यांचं मोडलं, तर फरक काय पडला,” असेही रावसाहेब दानवेंनी म्हटले.
“उद्धव ठाकरे काय बोलतात आणि त्यांच्या बोलवता धनी कोन आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हा देश लोकशाहीला मानणारा आहे. जो राजकीय पक्ष लोकशाहीला सोडून काम करण्याचा प्रयत्न करेल, त्याला जनता त्याची जागा दाखवून देईल. मग, २०२४ ची निवडणूक शेवटची कशी ठरेल,” असा सवाल रावसाहेब दानवेंनी उपस्थित केला आहे.
“देशात हुकूमशाही येणार का? लोकशाहीप्रमाणे यांनी पक्षाच्या निवडणुका घेतल्या नाहीत. हे लोकांना काय लोकशाही सांगत आहेत. खरे हुकूमशाह हे आहेत. कार्यकर्त्यांना कर्मचाऱ्यासारखं वागवून घेतात. आमच्याकडे कर्मचाऱ्यांना स्वातंत्र आहे. यांचं बोलणं हे नैराश्यातून आहे,” अशी टीका यावेळी रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.





