फलटण : फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर, भाजपचे जयकुमार गोरे आणि पाशा पटेल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मृत डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजून पदावर कशा? अजित पवार कोणत्या ‘रुपात’ अडकलेत?” असा खोचक सवाल महाजनांनी उपस्थित केला आहे. अजित पवार कोणत्या ‘रुपात’ अडकलेत? प्रकाश महाजन यांनी रुपाली चाकणकर यांच्या पत्रकार परिषदेला थेट लक्ष्य केले. चाकणकरांनी मृत डॉक्टरचे चॅट्स समोर आणून तिच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न केल्याचा आरोप महाजनांनी केला. “ती डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्याने आमचे भावनात्मक नाते आहे. एवढे घडूनही रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कशा? अजित पवार कोणत्या रुपात अडकलेत की त्यांना हटवत नाहीत?” असा सवाल करत महाजनांनी राष्ट्रवादीला खडसावले. “मृत महिलेच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, पण चाकणकरांसारख्या लोकांनी तिची बदनामी करणे हे महिलांच्या सुरक्षेचा अपमान आहे,” असंही ते म्हणाले. जयकुमार गोरे ‘बाहेरचे रोग’ आणणारे भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही महाजनांनी आसूड उगारले. “गोरे यांनीही चॅटिंगवर भाष्य करत डॉक्टरचे चारित्र्यहनन केले. ज्या महिलेला एक कोटी रुपये देताना ट्रॅप झाले, ते पैसे गोरे कुठून आणले? ईडीने त्यांना विचारले पाहिजे!” अशी टीका करत महाजन म्हणाले, “गोरेंसारखे लोक मूळचे भाजपचे नाहीत, बाहेरून आलेत आणि सोबत ‘रोग’ आणले. त्यांच्या दृष्टीने स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे, म्हणून असे वक्तव्य येतात.” राज्याच्या मंत्र्याने असे बोलणे हे लज्जास्पद असल्याचे सांगत महाजनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला: “रणजितसिंह नाईक निंबाळकरांना क्लीन चिट कशी काय? चौकशीत निर्दोष ठरले तर ठीक, पण अशी माणसे भोवती गोळा झाली तर पक्ष बदनाम होईल”, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. पाशा पटेल ‘उपटसुंभ’ आणि ‘मतलबी’ गोपीनाथ मुंडे यांच्या वारसावर बोलणाऱ्या पाशा पटेल यांना महाजनांनी ‘उपटसुंभ’ आणि ‘संधीसाधू’ म्हटले. “मुंडे साहेबांच्या निधनानंतर धनंजय मुंडेंनी अंत्यसंस्कार करावेत असे म्हणणारा पाशा पटेल आज वारस कोण हे सांगतो? धनंजय मुंडेंनी मुंडे कुटुंबीयांबद्दल काय उद्गार काढले होते, ते पटेलांना माहित नाही का?” असे खडसावत महाजन पुढे म्हणाले, “पाशा पटेल इतके मतलबी की त्यांची मुले त्यांना वारस ठरवतील का? मुंडे साहेबांचा वारसा ठरवण्याचा हक्क ओबीसी समाज आणि प्रेम करणाऱ्यांना आहे. फक्त पंकजा मुंडेच खरा वारस, दुसरे कोणी नाही”