Halwa Ceremony History : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी ‘हलवा’ का बनवला जातो? जाणून घ्या यामागचा इतिहास

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 1 फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ते आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात मध्यवर्गीय आणि निम्न वर्गीयांसाठी अनेक योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र जेव्हा जेव्हा अर्थसंकल्प सादर होण्याची तारीख जवळजवळ येऊ लागते, तशी ‘हलवा सेरेमनी’ची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. तर हे हलवा सेरेमनी नेमके काय आहे? यामागचा इतिहास आणि त्याचे महत्व काय आहे? याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
काय आहे ‘हलवा सेरेमनीचा इतिहास?
अर्थसंकल्पाचे दस्तऐवजीकरण झाल्यानंतर हलवा समारंभ साजरा केला जातो. त्यालाच ‘हलवा सेरेमनी’ म्हणतात. 1980 मध्ये सर्वप्रथम ही प्रथा सुरु झाली. हलवा सेरेमनी बजट प्रेसमध्ये होते. बजेट प्रेस ही नॉर्थ ब्लॉकमध्ये तळघरात आहे. याठिकाणी एका भल्या मोठ्या कढईत हलवा तयार केला जातो आणि मग सर्वजण तो हलवा खातात. या कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्र्यांपासून ते अर्थमंत्रालयातील सर्वच अधिकारी व कर्मचारी सहभागी होतात. यानंतर मग अर्थसंकल्पाची छपाई सुरू केली जाते.
दहा दिवस अधिकारी नॉर्थ ब्लॉकमध्ये राहतात
हलवा सेरेमनीनंतर अर्थसंकल्पाची छपाई होईपर्यंत 100 पेक्षा अधिक कर्माचारी आणि अधिकारी नॉर्थ ब्लॉकमध्येच राहतात. ही सर्व मंडळी दहा दिवसांपर्यंत नॉर्थ ब्लॉकमध्येच राहतात. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच ही सर्व मंडळी तेथून बाहेर पडतात. अर्थसंकल्पाशी निगडीत कोणतीही माहिती लीक होवू नये, यासाठी ही काळजी घेतली जाते. तसा नियमच करण्यात आला आहे.
हलवा सेरेमनीचे आयोजन का केले जाते?
हलवा सेरेमनीचे आयोजन अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण झाल्यानंतर आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या आधी केले जाते. कारण, देशाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थविभागातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र कष्ट घेतलेले असतात आणि आता त्यांच्या त्या कष्टाला फळ मिळणार असते. त्यामुळे त्या सर्वांमध्ये एकप्रकारचा उत्साह असतो.
तर भारतीय परंपरेनुसार कोणतेही शुभकार्य असल्यास गोड खाण्याची किंवा खावू घालण्याची परंपरा आहे. त्यामुळेच अर्थसंकल्प बनवण्यासाठी काम केलेल्या सर्वांचे हलवा खावू घालून तोंड गोड केले जाते. हिंदीमध्ये एक फेमस म्हण आहे. कोई भी शुभ कार्य करने से पहले कुछ मिठा हो जाये.. असे म्हंटले जाते.
एक वर्ष पडला होता या परंपरेत खंड
वर्ष 2022 मध्ये कोरोना महामारीमुळे आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक नियम बघता ही हलवा सेरेमनी केली गेली नव्हती. त्यावेळी अर्थसंकल्पाचे दस्ताऐवजीकरणही झाले नव्हते. तर ते डिजिटल स्वरुपात सादर केले गेले होते. त्यावेळी हलवा सेरेमनी ऐवजी मिठाई वाटप केली गेली होती. कोरोना महामारी संपल्यानंतर मग परत पारंपारिक हलवा सेरमनीला सुरुवात झाली.





