बॅालीवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता अक्षय खन्नाने साधारणपणे १९९५ सालच्या आसपास पदार्पण केलं. अक्षयने आपल्या इंडस्ट्रीच्या करिअरमध्ये काही मोजकेच पण चांगले सिनेमे दिले. डोली सजा के रखाना हा त्याचा सिनेमा खूप गाजला. त्यानंतर त्याने ताल, हलचल, रेस, दृश्यम इत्तेफाक या सिनेमात काम केलं. आपल्या वेगळ्या पण बोलक्या अभिनयाच्या जादूने त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केलं. आता अक्षय छावा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अक्षय औरंजेबची भूमिका साकारताना दिसणार आहे. छावाचा टीझर रिलीज झाल्यानंतर औरंजेबची भूमिका साकारणारा अक्षयचा टीझरमधला स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांची मनं जिंकून गेला. आता तो छावातून पुन्हा एकदा कम बॅक करत आहे. अक्षयच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. वयाची पन्नाशी गाठली तर या अभिनेत्याने अद्यापर्यंत लग्न केले नाही. यावर त्याला अनेकदा विचारणा केली जाते. त्याचे फॅन्सही त्याला लग्नाबद्दल अनेकदा विचारत असतात. यावर आता अक्षयने मनमोकळा संवाद साधत हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीवेळी लग्नाबद्दल आपलं मतं मांडलं आहे. “मी स्वत: विवाहित या दृष्टीकोनातून पाहू शकत नाही. सोप्या भाषेत बोलायचं झाल्यास मी मॅरेज मटेरियल नाही. मी त्यासाठी बनलोच नाही. लग्न ही एक कमिटमेंट असते, ज्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यात बरेच बदल होतात. लग्नामुळे बरंच काही बदलतं. मला माझं आयुष्य माझ्याच नियंत्रणात असलेलं आवडतं. जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करता, तेव्हा स्वत:च्या आयुष्यावर तुमचं संपूर्ण नियंत्रण राहत नाही. तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते.” असे मत अक्षयने या मुलाखतीवेळी मांडलं आहे. छावा १४ फेब्रुवारीला रिलीज अक्षयची मुख्य भूमिका असलेला छावा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला थिएटर्समध्ये रिलीज होत आहे. या सिनेमात अक्षय औरंगजबच्या भूमिकेत आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्या सिनेमातील भूमिकेबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ट्रेलरमध्ये तर अक्षय औरंजेबच्या भूमिकेत काही वेळासाठी दिसतो, पण त्याचा भारदस्त आवाज सगळ्यांच्या लक्षात राहतो. यामुळे अक्षय मोठ्या पडद्यावर औरंगजेब कसा वठवतो हे पाहणे महत्वाचे असेल. सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी देखील अक्षय हा मितभाषी असल्याचे सांगत त्याने केलेल्या आजवरच्या कामाचे कौतुक केले आहे.