Ambadas Danave : आयत्या वेळी खटला चालवायला का दिला नकार : दानवेंचा सवाल ; अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारला धरलं धारेवर

पुणेः सध्या राज्यात बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वातावरण तापलेलं आहे. देशमुख हत्येप्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना शरण आलेल्या वाल्मीक कराडला केज न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वाल्मीक कराड याचं एन्काऊंटर होऊ शकतो, असा दावा केला आहे. यानंतर उबाठा गटाचे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावर सरकारला धारेवर धरत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दानवे यांनी हा खटला केज आणि बीड सोडून इतर कोणत्याही न्यायालयात चालवावा, अशी सरकारकडे मागणी केली.
केज आणि बीड सोडून इतर ठिकाणच्या न्यायालयात हा खटला चालवावा, कारण ज्या ठिकाणचे पोलीसच आरोपीबरोबर बसतात आणि उठतात. अशाच पोलिसांकडे पुन्हा एकदा तपास दिला, तर काही दिवस जाऊन द्यायचे आणि पुन्हा एकदा आरोपीला बाहेर काढायचं अशा प्रकारची ‘स्टोरी’ तयार केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच जे पोलीस तपास करायला तयार नाहीत, त्यांच्याकडे तपास का ? असा सवाल त्यांनी राज्य सरकाला केला आहे. सरकारी वकिलांनी आयत्या वेळी खटला चालवायला का नकार दिला, यामागचे कारण शोधले पाहिजे, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
ही लटूपूटूची लढाईः दानवे
अजूनही सीआयडीने सीडीआर जाहीर केलेला नाही. मोबाईमधील व्हिडिओ काय आहे, कोणाकोणाचे फोन आहे, तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्यांचा सहभाग या प्रकरणाशी आहे, तो आरोपी होऊ शकतो, असे दानवे म्हणाले. या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी गठीत केली असून या एसआयटीच्या टीममध्ये तरबेज अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली. अटकेनंतर ही लटूपूटूची लढाई वाटू लागली असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.





