West Bengal Politics : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते अर्घ्य रॉय प्रधान यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय समीकरणे ढवळून काढली आहेत. भाजपमध्ये प्रवेश करताच अर्घ्य रॉय प्रधान यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. “भ्रष्ट पक्षाला पाठिंबा देत जनतेसमोर जाऊ शकत नाही. राज्यात आता जनता विरुद्ध ममता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी टीएमसीवर जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करत पक्ष संपत चालल्याचा दावा केला. त्यांनी पुढे विरोधकांशी युतीच्या चर्चांवरही टीका करत टीएमसी समाजात फूट पाडत असल्याचे म्हटले. दरम्यान, भाजपच्या पत्रकार परिषदेत सुवेंदू अधिकारी यांनी अर्घ्य रॉय प्रधान यांच्या कामाचा उल्लेख करत, त्यांनी कूचबिहारच्या विकासासाठी मोठे योगदान दिल्याचे सांगितले. उत्तर बंगालच्या विकासासाठी त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्याचेही त्यांनी नमूद केले. अर्घ्य रॉय प्रधान हे दीर्घकाळ टीएमसीमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पक्षांतरामुळे निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, याचा थेट परिणाम निवडणूक निकालांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.