नेवासा (प्रतिनिधी) : साखर आयुक्त,कामगार आयुक्त यांच्याकडून सविस्तर प्रस्ताव घेऊन आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांचे वेतनवाढीसाठी त्रिपक्ष समिती गठीत करण्याचा निर्णय लवकरच घेऊ अशी ग्वाही राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढ त्रिपक्ष समिती गठीत करणे व इतर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बुधवार (दि.७) ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मंत्रालयामध्ये सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे दालनात कामगार संघटनांचे प्रतिनिधी व संबंधीत विभागाचे अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक,सरचिटणीस नितीन पवार, कामगार नेते आमदार भाई जगताप, साखर आयुक्त डॉ.कुणाल खेमनार, कामगार आयुक्त डॉ.एच.पी. तुमोड तसेच सुनील शिंदे, राजेंद्र होनमाने,उदय भंडारी,सुखदेव फुलारी, संभाजीराव माळवदे, संजय राऊत आदी उपस्थित होते. या बैठकीत अविनाश आदिक यांनी, सप्टेंबर २०२४ मध्ये विधान सभा निवडणूक आचार संहिता लागू होत आहे. तसेच ऑक्टोबर पासून साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू आहेत. अशा परिस्थितीत सारख कामगारांची नाराजी आणि संपावर जाणे सारख उद्योगाला परवडणारे नाही.त्रिपक्ष समिती उशीरा गठीत झाल्यास, वेतन फरक रक्कम कामगारांना लवकर दिली जात नाही. काही कारखान्याकडे अजून ही मागील १२ टक्के वेतनवाढ कराराची फरक थकीत आहे.त्यामुळे त्रिपक्ष समिती तातडीने गठीत करावी अशी मागणी केली. या बैठकीमध्ये साखर कामगारांच्या वेतन वाढ करण्याकरिता राज्य सरकारने त्रिपक्षीय समिती तात्काळ गठीत करून वेतन वाढीचा करार पूर्ण करावा, राज्यातील साखर कामगारांचे थकीत वेतन देण्यात यावे, ज्या साखर कारखान्यांनी मागील त्रिपक्षीय समितीने केलेला कराराची अंमलबजावणी केली नाही, वेतन वाढ दिलेली नाही अशा कारखानदारांना गाळप परवाना देऊ नये अशा मागण्या करण्यात आल्या. त्यावर सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी त्रिपक्षीय समिती गठीत करण्याबाबत आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याबाबत सांगितले. त्याचबरोबर साखर कामगारांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन त्यानंतर पुन्हा एकदा साखर कामगार नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन पुढील बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले.