मुंबई: कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या 11 नेत्यांना सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी दुपारी श्रीनगर विमानतळावरूनच दिल्लीला पाठवण्यात आले. त्यानंतर शिवसेनेने राहुल गांधींना उपरोधिक टोला लगावला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राहुल गांधींना पिकनिकसाठी जायचे असल्यास आम्ही त्यांच नियोजन करू, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.
जम्मू-काश्मीरमधली परिस्थिती नाजूक असल्याकारणाने त्यांना तिथे जाण्यापासून मज्जाव केला आहे, तरीही त्यांना पिकनिकसाठी जाण्याची इच्छा असल्यास आम्ही त्याचं पूर्ण नियोजन करू, असा शब्दच राऊतांनी दिला आहे. तसेच कलम 370 रद्द करून कोणाच स्वप्न पूर्ण झाल आहे हे मी सांगू शकत नाही. पण देश या निर्णयाची वाट पाहत असल्याच मी नक्कीच सांगू शकतो. त्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आभारी आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.