अहमदाबाद :- कॉंग्रेसने दहशतवादाच्या बाबतीतही मतपेढीचेच राजकारण केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील प्रचार सभेत केला होता. त्याचा कॉंग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
खर्गे यांनी आज येथे बोलताना सांगितले की, आम्ही दहशतवादाच्या विरोधातील लढाईत दोन पंतप्रधान गमावले आहेत. राजीव गांधी (Rajiv Gandhi) आणि इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी देशाच्या अखंडत्वासाठी बलिदान दिले. भाजपने असे कोणते बलिदान दिले आहे काय असा सवाल करीत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तरी भाजपच्या नेत्यांनी योगदान दिले आहे काय असा प्रश्न खर्गे यांनी उपस्थित केला आहे.
खर्गे म्हणाले की, आम्ही नेहमीच दहशतवाद्यांशी लढण्याचे काम केले आहे. देशात शांतता राखण्यासाठी आम्ही आमच्या नेत्यांचे बलिदान दिले आहे. गुजरातमधील खेडा येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की कॉंग्रेस दहशतवादाकडे मतपेढीच्या नजरेतून पाहते. ते केवळ मते जातील या भीतीपोटी दहशतवादाच्या विरोधातही मूग गिळून गप्प बसतात असा आरोपही मोदींनी केला होता. त्या अनुषंगाने खर्गे बोलत होत.
पुढे ते म्हणाले की, ही राज्य विधानसभेची निवडणूक आहे, संसदेची नाही. आम्ही राज्याशी संबंधीत मुद्दे घेऊन तुमच्यासमोर आलो आहोत. आता मोदींनी त्यांच्या राजवटीत राज्यातील अपयशाविषयी बोलले तर बरे होईल असे ते म्हणाले. गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या भाजपच्या निवडणुकीतील आश्वासनावर खर्गे म्हणाले की हा समाजात फूट पाडण्याचा आणि मतांसाठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यांचा उद्देश आम्हाला चिथावणी देणे आणि समाजात फूट पाडणे हा आहे, परंतु आम्ही त्यांच्या फंदात पडणार नाही.
भाजपच्या विकासाच्या ‘गुजरात मॉडेल’वरही खर्गे यांनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, त्यांना राज्यातील सरकारी रिक्तपदेही भरता आलेली नाहीत आणि हे लोक विकासाचा दावा करीत आहेत. ते म्हणाले की आज सरकारी विभागांमध्ये 28,000 शिक्षकांसह पाच लाख पदे रिक्त आहेत.त्या रिक्त जागा भरण्याची त्यांनी कधीच फिकीर केलेली नाही.