Satyajit Singh Patankar : नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची साथ सोडत सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचा पक्ष प्रवेश मुंबईत भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत झाला. पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यापूर्वी खासदार शरद पवार यांना सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. पक्ष बदलत असताना आम्ही वेगळ्या वाटेने किंवा सुरतमार्गे गुवाहाटीला गेलो नाही, असा खोचक टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव न घेता लगावला. तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न व विकासकामे मार्गी लागण्याचा विश्वास वाटल्यानेच पक्षाच्या नेत्यांकडे कोणत्याही अटी शर्ती न ठेवता भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे देखील सत्यजितसिंह पाटणकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबतही त्यांनी भाष्य केले. भाजपच्या माध्यमातून हा प्रश्न ऐरणीवर आणून तो सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. परंतु, त्यासोबत तेथील स्थानिक माणूसही जगला पाहिजे आणि शेतीही वाचली पाहिजे, ही आपली भूमिका आहे, असे देखील ते बोलताना म्हणाले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाटणकर यांनी कराड येथील राज्याचे पहिले दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील, राजाभाऊ शेलार, रमेश मोरे, पाटण अर्बन बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब राजेमहाडिक, अभिजित पाटील आदींसह विविध संस्थांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार सत्यजितसिंह पाटणकर यांनी 10 जून 2025 रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात पार पडला. या पक्षप्रवेशाने शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातो. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पक्षप्रवेशाने सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाटणकर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. हेही वाचा: परिवहन मंत्र्यांची एसटीच्या अधिकृत हॅाटेल थांब्याला अचानक भेट; पाहणीत आढळल्या अनेक त्रुटी, जागेवरच घेतला मोठा निर्णय