राजगुरुनगरमध्ये संतापाची लाट! अल्पवयीन मुलीच्या खुनाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च, आरोपीला फाशीची मागणी

राजगुरुनगर- खेड तालुक्यातील मांजरेवाडी धर्म येथे ११ एप्रिल रोजी अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नवनाथ मांजरे (वय ३२) याला फाशीची शिक्षा द्यावी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा, या मागणीसाठी राजगुरूनगर शहरात मंगळवारी (१५ एप्रिल) भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मोर्चात राजगुरुनगर आणि मांजरेवाडी परिसरातील महिला, युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या घटनेने परिसरात प्रचंड संताप उसळला असून, पीडित मुलीला न्याय मिळावा, यासाठी एकजुटीने आवाज उठवण्यात आला. नराधम पोलीस कस्टडीत आहे.
कॅन्डल मार्चद्वारे व्यक्त झाला रोष
हुतात्मा स्मृती स्थळापासून उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयापर्यंत शांततापूर्ण कॅन्डल मार्च काढण्यात आला. सहभागी नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन पीडित मुलीला श्रद्धांजली अर्पण केली आणि तिच्यासाठी त्वरित न्यायाची मागणी केली. मोर्चात सामील झालेल्या महिलांनी अशा क्रूर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची आवश्यकता व्यक्त केली. “आम्हाला न्याय हवा आहे, अशा नराधमांना फाशी द्या,” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मोर्चातील सहभागाने समाजातील संवेदनशीलता आणि एकजुटीचे दर्शन घडवले.
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
मार्चनंतर उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांना नागरिकांनी निवेदन सादर केले. निवेदनात आरोपी नवनाथ मांजरे याला फाशीची शिक्षा देण्यासह या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी करण्यात आली. तसेच, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना आणि गस्त वाढवण्याची मागणीही नोंदवण्यात आली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी तपासाला गती देण्याचे आणि योग्य कारवाईचे आश्वासन दिले.
घटनेची पार्श्वभूमी-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित अल्पवयीन मुलगी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती.११ इयत्तेची परीक्षा देऊन क्लाससाठी ती महाविद्यालयात नेहमीप्रमाणे येत होती. दि. ११ रोजी राजगुरुनगर येथे नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास घरी जाण्यासाठी पाबळ रोड येथे थांबली असताना,आरोपी नवनाथ मांजरे तिथे आला. घरी यायचे का असे म्हणून पिडितेला दुचाकीवर बसविले. दरम्यान मला उसाच्या शेताला दोन पाण्याची बारी द्यायची आहे असे मुलीला सांगुन मांजरेवाडी पिंपळ, मलघेवाडी या मार्गच्या रस्त्याने त्याच्या नदी काठच्या उसाच्या शेतात नेले. आरोपीने पिडित मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.पिडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने पीडित मुलीच्या डोक्यात शेतातील दगड उचलून टाकला. तिचा मृतदेह शेतालगतच असणाऱ्या भिमा नदीच्या पात्रात दिडशे फुट ओढत नेऊन टाकला, अशी आरोपीने कबुली दिली असल्याचे महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल राजे यांनी सांगितले.
रविवार दि. १३ रोजी पिडित मुलीच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा सोहळा गावातच होणार होता. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते. मात्र आदल्या दिवशीच छोट्या बहिणीचा खून झाल्यामुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोपी गावामधीलच असल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गाव ते स्माशानभुमी पर्यत कुठलाही अनुसुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. यावेळी ग्रामस्थ व नातेवाईकांनी आरोपीला फाशी द्यावी. अशी मागणी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे केली.
आरोपी घटना घडल्यानंतर बिनदक्तपणे गावात हिंडत होता जसे काही घडलेच नाही. घटनेनंतर तो जऊळके येथे यात्रेला जाऊन आला. दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमान जयंती निमित्त स्वःताच्या किराणा दुकानात नारळ विकत होता. तसेच माझ्या शेतात नदीलगत कोणीतरी बाईचा ओरडण्याचा आवाज आला आहे. मी घाबरून तिकडे गेलो नाही, असे गावात सांगत होता.
समाजातून तीव्र प्रतिक्रिया
या घटनेने समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोर्चात सहभागी झालेल्या युवतींनी सांगितले की, “अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय समाजात बदल होणार नाही.” स्थानिकांनी प्रशासनावर टीका करताना, मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. या कॅन्डल मार्चने राजगुरुनगरच्या नागरिकांच्या संवेदनशीलतेचे आणि एकजुटीचे दर्शन घडवले आहे.
पुढील कारवाईकडे लक्ष
या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रशासन आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करताना त्वरित आणि कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. जलदगती न्यायालयात खटला चालवला गेल्यास पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळेल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला.





