पुणे | जिल्ह्यात १८० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे जिल्ह्यातील १४४ गावे आणि ९२३ वाड्या-वस्त्यांना १८० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ही गावे आणि वाड्या-वस्त्यांमधील मिळून एकूण २ लाख ६२ हजार ६९६ लोकसंख्या तहानलेली असून, या लोकसंख्येची तहान टँकरच्या पाण्याद्वारे भागविण्यात येत आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत असतानाच दुष्काळाचा दाहकताही वाढत आहे. परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील अनेक गाव व वाड्या-वस्त्यावंर तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धरणे, तलाव आटल्याने टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असला तरीही कडाक्याच्या उन्हात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक ८० टँकर पुरंदर तालुक्यात सुरु असून, या तालुक्यातील सर्वाधिक ५३ गावे ३४९ वाड्या-वस्त्यांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. पुरंदरपाठोपाठ बारामती तालुक्यातील टंचाईग्रस्त १७ गावे आणि २०७ वाड्या-वस्त्यांसाठी २८ टँकर सुरू आहेत.
त्यानंतर आंबेगाव २०, शिरुर ११, भोर ९, खेड ४, दौंड ९, हवेली ८, इंदापूर ४, जुन्नर १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मावळ, मुळशी आणि वेल्ह्यात टॅंकरवर अलंबवून राहण्याची वेळ आली नाही, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणपुरवठा विभागाकडून देण्यात आली.




