पुणे – यंदा मोसमी पाऊस कमी होण्याची शक्यता विविध हवामान संस्थांनी वर्तवली आहे. शिवाय, खडकवासला धरणसाखळीत उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन महापालिकेकडून शहरात पाणीकपात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत दि.18 मेपासून शहरात प्रत्येक गुरुवारी पाणी बंद ठेवण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यावेळी उपस्थित होते. शासनाने धरणातील पाणीसाठ्याचे ऑगस्ट 2023 अखेर पर्यंत नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, महिन्याभरानंतर पुन्हा पाण्याचा तसेच पावसाचा आढावा घेऊन ही कपात वाढवायची की रद्द करायची याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले. तसेच या निर्णयाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. खडकवासला धरणसाखळीत सध्या 9.78 टीएमसी (34 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.
तूर्त दि. 18 मेपासून प्रत्येक गुरुवारी पाणी बंद ठेवले जाईल. तर जूनमध्ये पावसाचा सुधारित अंदाज तसेच प्रत्यक्ष पावसाची स्थिती लक्षात घेऊन पुढे दिवसाआड पाण्याबाबत निर्णय घेतला जाईल. या कपातीमुळे महापालिकेस पुढील तीन महिन्यांत पाऊण टीएमसी पाणी वाचणार आहे.
– विक्रम कुमार(महापालिका आयुक्त)
20 ठिकाणी बसविले एअर व्हॉल्व
शहराचा आकार एखाद्या बशीसारखा असल्याने एक दिवस पाणी बंद ठेवण्यात आल्यानंतर जलवाहिनीत “एअर’ भरत असल्याने तसेच पाण्याच्या टाक्यांमध्ये आवश्यक ते पाणी पोहचत नसल्याने पुढील दोन ते तीन दिवस उंच भाग तसेच जलवाहिन्याच्या शेवटी असलेल्या भागात पाणी जात नाही. त्यामुळे पाणीबंदचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी लोक प्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत केली होती. तसेच पालिकेने यावर तोडगा काढावा आणि नंतर कपात लागू करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने तांत्रिक विश्लेषण करून सुमारे 20 ठिकाणी नवीन एअर व्हॉल्व बसविले आहेत. याशिवाय पाणी बंदनंतरच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तांत्रिक बाबींची माहिती असलेल्या अभियंत्यांची पथके तयार करण्यात आली आहेत.