Khed Water Scarcity: खेड तालुक्यात पाणीबाणी! १७ गावे अन् १११ वाड्यांना टँकरचा आधार; पाहा भीषण वास्तव
Khed Water Scarcity: गुळाणी, वाफगाव ते कोहिंडे, वाशेरेपर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष; पूर्व आणि पश्चिम भागातील गावांना खाजगी विहिरींमधून टँकरद्वारे पाणी देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न.

Khed Water Scarcity – खेड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने आणि जलस्रोतांनी तळ गाठल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. तालुक्यातील 17 गावांमधील तब्बल 111 वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून सुमारे 27 हजार नागरिकांना सध्या 14 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एप्रिल महिन्यापासून पाच अधिग्रहित विहिरींमधून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक गावांना 10 ते 30 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने टँकर वेळेवर पोहोचण्यात अडचणी येत आहेत.
परिणामी नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. पशुपालकांना विहिरी आणि उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून अनेकांचा दिवस जनावरांच्या पाण्याच्या व्यवस्थेतच जात आहे. शाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी पाण्याचे जार खरेदी करण्याची वेळ आली आहे.
भामा-भीमा नदीपात्र कोरडे पडल्याने अनेक नळपाणी पुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. पाझर तलाव आटले असून बहुतांश विहिरींनी तळ गाठला आहे. रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेल्याने खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे ठप्प झाली आहेत. आद्रा नक्षत्रातही पावसाची कोणतीही चिन्हे नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पश्चिम भागातील सह्याद्री पर्वतरांग आणि भीमाशंकर अभयारण्य परिसरात मान्सूनपूर्व पावसानंतर धुळवाफ्यावर टाकलेल्या भात रोपांची जगवणूक करण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू आहे.
दरम्यान, करवंदे, जांभळे आणि रायवळ आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी करवंदे आणि जांभळांना मिळणार्या चांगल्या बाजारभावामुळे आदिवासी भागातील शेतकर्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळत आहे. एकीकडे वाढती पाणीटंचाई आणि दुसरीकडे लांबलेला मान्सून यामुळे खेड तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि पशुपालक दुहेरी संकटाचा सामना करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
14 टँकरद्वारे सुरू पाणीपुरवठा
तालुक्याच्या पूर्व भागातील गुळाणी, वाफगाव, वाकळवाडी, गाडकवाडी, वरुडे, गोसासी, कनेरसर आणि पुर या गावांसह त्यांच्या वाड्या-वस्त्यांना रेटवडी येथील दोन खाजगी विहिरींमधून सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर पश्चिम भागातील तळवडे, कोहिंडे बुद्रुक आणि वाशेरे या गावांना कडूस येथील खाजगी विहिरीतून तीन टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. चासकमान धरण परिसरातील आदिवासी भागातील टोकावडे, नायफड, आव्हाट, वाळद, वाडा तसेच कोयाळी तर्फे वाडा येथील वस्त्यांना वाडा येथील दोन खाजगी विहिरींमधून पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.






