War Update: पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य संघर्षाचा फटका आता संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) बसला असून, गुरुवारी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यूएईच्या हवाई संरक्षण प्रणालीने इराणकडून डागलेली क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली, मात्र त्यांचे अवशेष अबू धाबीच्या गजबजलेल्या रस्त्यांवर कोसळल्याने ही जीवितहानी झाली. हवेतच क्षेपणास्त्रे उडवली, पण अवशेषांनी घात केला – मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी इराणच्या दिशेने राजधानी अबू धाबीला लक्ष्य करून काही क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. यूएईच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेने ही क्षेपणास्त्रे अचूकपणे टिपली आणि ती हवेतच उद्ध्वस्त केली. दुर्दैवाने, या क्षेपणास्त्रांचे जळते अवशेष थेट रस्त्यावर कोसळले. या दुर्घटनेत एका भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका भारतीय नागरिकाचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. हेही वाचा – महाराष्ट्रात इंधनाची खरी परिस्थिती काय? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…. पश्चिम आशियात तणाव वाढला – गेल्या काही काळापासून पश्चिम आशियात सुरू असलेल्या हल्ले-प्रतिहल्ल्यांच्या सत्रामुळे युद्धाची तीव्रता वाढत चालली आहे. या संघर्षाची झळ आता निर्दोष नागरिकांना सोसावी लागत आहे. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 4 हजाराहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. यंत्रणा सतर्क, नागरिकांमध्ये भीती – या घटनेनंतर यूएई प्रशासनाने आपली सुरक्षा यंत्रणा अधिक कडक केली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. इराण आणि इस्रायलमधील तणावाचे सावट आता संपूर्ण आखाती देशांवर पसरले असून, या घटनेमुळे तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.