Waqf Board : महाराष्ट्रातील 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने केला दावा; कोर्टामध्ये याचिका दाखल

लातूर : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या ठिकाणी तब्बल 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाकडून दावा करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या सर्व शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यानंतर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली आहे.
शेतकऱ्यांनी दिला इशारा
लातूरच्या तळेगावमधील 103 शेतक-यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवली आहे. लातूर जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. वक्फ बोर्डाची संपत्ती इस्लामी कायद्यानुसार केवळ धार्मिक आणि लोकोपयोगी कामासाठी वापरली जाऊ शकते. महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरणानं संभाजीनगर कोर्टात याबाबत याचिका दाखल केली आहे.
तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या जमिनी पिढ्यानपिढ्या आपल्याच वहिवाटीखाली आहेत. त्या वक्फ बोर्डाच्या नाहीत असं शेतक-यांनी सांगितले. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.





