पाणी पळवणारा की देणारा आमदार हवा?

बेल्हे – आमच्या हक्काचे पाणी असताना आणि आमची गावे नदीकाठावर असून देखील केवळ विद्यमान लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे आम्हाला पाणी मिळाले नाही. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे आपले हक्काचे पाणी देणारा आमदार पाहिजे की पाणी पळविणारा आमदार पाहिजे हे आपण या निवडणुकीत ठरवून चारित्र्यवान, अभ्यासू आणि उच्चशिक्षित अशा उमेदवार मागे उभे राहिले पाहिजे असा विचार जाधववाडी गावचे माजी सरपंच एकनाथ जाधव यांनी व्यक्त केला.
जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांच्या प्रचारार्थ राजुरी-बेल्हे जिल्हा परिषद गटातील जाधववाडी, यादववाडी परिसरात गाव भेट दौरा व मतदारांशी संवाद साधताना जाधववाडी येथे मतदारांशी सवांद साधताना जाधव बोलत होते. यावेळी जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, गावच्या सरपंच आशा जाधव, दत्तात्रय घोलप, बाळासाहेब खिलारी, बाळासाहेब जाधव, सदाशिव जाधव, अमोल जाधव, रघुनाथ जाधव, किसन जाधव, सचिन जाधव, शरद बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.
एकनाथ जाधव म्हणाले की, तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आम्हाला कामांचे फक्त आश्वासनेच दिली आहे. या पाच वर्षांत काहीच काम या ठिकाणी झालेले नाही. यावर्षी आमच्या शेतीला पाणी न मिळाल्यामुळे याचा परिणाम ऊस उत्पादकावर होणार आहे, त्यामुळे यंदा आम्ही पाणी मिळवून देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या पाच वर्षांत लोकप्रतिनिधींनी बैलगाडा शर्यती सुरू करू, तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ, अशी फक्त आश्वासनेच दिली आहेत. या निवडणुकीत मी उभा नसून जनता उभी आहे, तसेच या भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
– अतुल बेनके, उमेदवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जुन्नर विधानसभा मतदारसंघ





