प्रभात वृत्तसेवा वाल्हे – मागील आठवड्यात सलग दोन-तीन दिवस पहाटे धुके पडत होते. यानंतर वातावरणात अनेक बदल होऊन दररोज पहाटे धुके, दिवसभर ढगाळ वातावरण, दव, उन्हाची कमतरता, कडाक्यांची थंडी आदी वातावरणातील बदलाने कांदा उत्पादन, तसेच रब्बी हंगामातील बहुतांश पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढले आहे. दीड महिन्यांपासून वातावरणातील विविध बदल पिकांवर विविध रोगराईला निमंत्रण देत आहोत. कांदा, गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला हे सर्व कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची तसेच लागवड केलेल्या कांद्याचे, काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. पहाटेच्या वेळी धुके व दवबिंदू पडत आहेत. त्यामुळे लाल कांदा, उन्हाळी कांद्याच्या रोपांवर तसेच लागवड केलेल्या कांद्यावर, करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे महागड्या औषधांची फवारणी करून शेतकरी पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.नगदी पिक म्हणून वाल्हे परिसरामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, लागवड केलेल्या कांद्याला तसेच काढणीला आलेल्या कांद्याच्या पिकांवर मागील काही दिवसांपासून रात्री धुके व पहाटे दवबिंदू, दिवसभर ढगाळ वातावरणामुळे करप्याचा प्रादुर्भाव होत आहे.दररोज धुके पडत असल्याने कांदा उत्पादक अडचणीत सापडत आहे.सध्या कांद्याला मिळणारा बाजारभाव कमी प्रमाणात असून,सध्याच्या कांद्याच्या लागवडीचा खर्च देखील वसुल होणे अवघड होत आहे. मात्र, पुढील काही दिवसांत कांदा उत्पादन अल्प प्रमाणात होणार असून भविष्यात कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकरी महागडी रोपे आणून लागवड करीत आहेत. मात्र, वातावरणातील बदलामुळे कांदापात पिवळी पडत आहे. लागवड केलेल्या कांद्यावरही धुक्याचा परिणाम होत आहे. कांदा उत्पादक शेतकरी कैलास पांडूरंग भुजबळ म्हणाले, मागील काही दिवसांपासून पहाटे दररोज धुके पडत असल्याने धुक्यामुळे कांद्याची पात करपत आहेत. त्यातून संपूर्ण पिकांवर करपा रोग पडण्याची शक्यता असून त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. हे धुके शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणारे ठरत आहे. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च वाढू लागला आहे. शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपडत आहेत”.