प्रभात वृत्तसेवा कान्हे – अलिकडच्या काही महिन्यांत पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनी महाराष्ट्रातील तसेच देशभरातील मतदारांना विचार करायला भाग पाडले आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुका आता पैशांच्या दिखाव्यात रूपांतरित झाल्या आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून झालेल्या तथाकथित लक्ष्मी दर्शनाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेलाच एक धोकादायक वळण लावले आहे.पूर्वीच्या काळात निवडणुका विकासाच्या मुद्द्यांवर, कामगिरीच्या आधारे आणि विचारधारेच्या बळावर लढवल्या जात होत्या. उमेदवाराची प्रतिष्ठा, केलेली कामे, जनतेतील संवाद आणि समाजकारणातील सहभाग हीच खरी भांडवले होती. पण आता चित्र पूर्णपणे उलट झाले आहे. उमेदवाराकडे पैसा नसेल, तर मतदारांपर्यंत पोहोचणे कठीण ठरतेय. आज ज्याच्याकडे पैसा, त्याच्याच हाती सत्ता असा समज समाजाच्या मनात घट्ट बसला आहे. निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे आणि पार्ट्या जणू परंपरेचाच एक भाग बनले आहे. पूर्वी गरजू मतदारांनाच काहीतरी देणगी दिली जात असे, परंतू आता जवळपास प्रत्येक मतदाराला लक्ष्मीदर्शन दिले जात आहे. ही गोष्ट केवळ लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांपुरती मर्यादित राहिलेली नसून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांतही हा ट्रेंड तितकाच दिसत आहे. त्यामुळे पैश्यांविना निवडणूक लढवणे आता जवळजवळ अशक्य झाले आहे. लोकसभा आणि विधानसभेतील उमेदवारांनी मतदारांना पैसे, भेटवस्तू आणि विविध आकर्षक योजना दाखवून मतांची खरेदी केल्याचे प्रकार सर्वदूर चर्चेत आहेत. या गोष्टींचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होत आहे. एकेकाळी गावातील कार्यकर्त्यांनी लोकसेवेच्या भावनेने ग्रामपंचायतीत प्रवेश केला. पण आता तो काळ संपला आहे. राजकारण म्हणजे पैशांचा खेळ.. आजच्या राजकारणात आर्थिक बळाशिवाय कोणतीही निवडणूक लढवणे जवळपास अशक्य झाले आहे. उमेदवारांकडे आर्थिक पाठबळ असेल, तर पक्षाची तिकिटेही सोपी होतात. पैशाच्या बळावर सभा, मेळावे, जाहिराती, कार्यकर्त्यांचा सांभाळ या सर्व गोष्टी शक्य होतात. परिणामी प्रामाणिक पण गरीब कार्यकर्त्यांना केवळ सतरंज्या उचलण्याचेच काम उरले आहे. पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकणारे नेते एकदा सत्तेवर आले की, त्यांनी केलेला खर्च वसूल करण्याकडेच त्यांचे पहिले लक्ष असते. विकास आणि लोकहित यांसारख्या मूलभूत गोष्टी मागे पडतात,आणि भ्रष्टाचाराचा फास अधिक घट्ट होतो. विचार करण्याची गरज.. आजच्या निवडणुकांची परिस्थिती निराशाजनक वाटते, पण आशेची किरणे अजूनही संपलेली नाहीत. समाजात अजूनही असे मतदार आहेत जे कामावर, प्रामाणिकपणावर आणि विकासाच्या दृष्टीकोनावर मत देतात. माध्यमांनी आणि सुजाण नागरिकांनी या प्रवृत्तीविरुद्ध ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. सरकार आणि निवडणूक आयोगानेही पैशाच्या खेळावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. अन्यथा भविष्यात निवडणुका ही केवळ धनदांडग्यांची मक्तेदारी बनतील आणि सामान्य कार्यकर्ते व मतदार यांची भूमिका केवळ प्रेक्षकांपुरतीच मर्यादित राहील.