सातारा – ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी, मी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याबद्दल केलेले वक्तव्य धादांत खोटे आहे. त्यामुळे राऊत यांनी दोन दिवसांत आपले म्हणणे मागे घेतले नाही तर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल असा असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. दरम्यान, सुरतला गेलो तेव्हापासूनच “मातोश्री’ची दारे बंद केल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.
विश्रामगृह सातारा येथे त्यांनी आज पत्रकार परिषदेत हे स्पष्टीकरण दिले. मंत्री देसाई म्हणाले, विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर आम्ही सुरतला गेलो. तेव्हापासून उद्धव ठाकरे परिवारासाठी माझे अर्धा सेकंदही बोलणे झालेले नाही. तसेच कोणा त्रयस्थांमार्फतही निरोप दिलेला नाही. विनायक राऊत यांनी केलेले वक्तव धादांत खोटे आहे. महाविकास आघाडीतील आमदार आमच्या संपर्कात असल्याचे आमच्याकडून वक्तव्य झाले होते.
ते खोडून काढण्यासाठी राऊत बोलले असावेत. पण, त्यांनी माझ्याबाबतचे वक्तव्य मागे घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत देणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी पाटण दौऱ्यावर आल्यानंतर पालकमंत्री देसाई यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्याचाही खरपूस समाचार देसाई यांनी घेतला. अजित पवारांनी त्यांचे भाषण नैराश्येतून केले असल्याचे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले. देसाई म्हणाले की, अजित पवार यांच्या पाटण तालुक्याच्या दौऱ्यामध्ये स्वागतासाठी एखादं-दुसरं बॅनर दिसलं.
तर पाटणमध्ये एकच स्वागत कमान दिसून आली. सभागृहातही दोन हजारांपेक्षा अधिक माणसे त्यांचे भाषण ऐकण्यासाठी नव्हती. मागील सहा महिन्यांत तर सत्यजित पाटणकरांचे दोन मोठे पराभव केले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. खासदार संजय राऊत यांची सकाळची भुणभुण ऐकायची सवय अजित पवार यांना असावी, अशी टीका करतानाच मंत्री देसाईंनी राऊतांच्या डोक्यावर पत्रा चाळीची टांगती सुरी आहे. ती कधी खाली येईल ते समजणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील टीकेच्या प्रश्नावर देसाई यांनी, पवार हे मोठे नेते आहेत, जमालगोटा शब्द ग्रामीण भागात वापरतात, हे त्यांना माहीत नसावे असा टोला लगावला.