“पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई कार्यकर्त्यांना…” ; नीलम गोऱ्हेंवर आरोप करताना ठाकरे गटाच्या नेत्याची कबुली

Vinayak Pandey on Neelam Gorhe । दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर दोन मर्सिडीज घेऊन पदं मिळत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याच आरोपांवरून आता राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांवर ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
या बाईंनी काय-काय केलं ते अनेक कार्यकर्ते सांगतील Vinayak Pandey on Neelam Gorhe ।
विनायक पांडे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका करताना, “मी शिवसेनेचा शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपमहापौर, महापौर होतो. उद्धव साहेबांनी कधीही माझ्याकडून पदासाठी एक रुपयाही मागितला नाही. चांगलं काम करतो, डॅशिंग कार्यकर्ता आहे म्हणून पद देत गेले. शिवसेनेने मला भरभरुन दिलं. उद्धव साहेबांनी माझ्याकडून एक पैसाही घेतला नाही” अशी कबुली विनायक पांडे यांनी दिली. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना विनायक पांडे यांनी “विधानसभा निवडणुकीला निलम गोऱ्हेंनी माझ्याकडून पैसे घेतले. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते पुढे येतील, या बाईंनी काय-काय केलं ते सांगतील” असं विनायक पांडे म्हणाले.
“मूळात त्यांनी जो विषय दिल्लीत मांडला, मराठी साहित्य संमेलनाच व्यासपीठ त्यासाठी नव्हतं. त्यांनी मराठी साहित्याविषयी भूमिक मांडायला पाहिजे होती. त्या बाईंना भूमिका मांडता येत नाही. मला त्यांची कीव येते” अशीही टीका विनायक पांडे यांनी केली. कोणत्या नेत्यांकडून निलम गोऱ्हे यांनी पैसे घेतले? पत्रकारांच्या या प्रश्नावर विनायक पांडे म्हणाले की, “अनेक नेते पुढे येतील. पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई कार्यकर्त्यांना पुढे जाऊ द्यायच्या नाही. हे सत्य आहे”
‘तिकीटासाठी मी पैसे दिले’ Vinayak Pandey on Neelam Gorhe ।
“मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. मी बाळासाहेब, उद्धव साहेबांसाठी काम केलं. पण काही कार्यकर्ते नवीन असतात, त्यांना सत्तेची, पदाची अपेक्षा असते. ही बाई ज्या-ज्या ठिकाणी संपर्क नेता होती, तिथे त्या मातोश्रीपर्यंत पोहोचूच द्यायची नाही. तिकीटासाठी मी पैसे दिले” असा दावा विनायक पांडे यांनी केला.
पुढे विनायक पांडे म्हणाले की, स्पर्धा होती, “इथे मी आणि अजय बोरस्ते होतो. या स्पर्धेचा हे लोक फायदा उचलतात” “निलम गोऱ्हेंनी 100 टक्के तिकीट देतो असं सांगितलेलं. पण अजय बोरस्तेला तिकीट मिळालं. मी शहरप्रमुख, उपमहापौर झालो, उद्धव ठाकरेंनी एक रुपया माझ्याकडे मागितला नाही. ठाकरेंकडे अशा गोष्टी घडत नाहीत” असेही विनायक पांडे म्हणाले.
निलम गोऱ्हेंनी हे पैसे कोणाकडे दिले?
निलम गोऱ्हेंनी हे पैसे कोणाकडे दिले? माहित नाही असं विनायक पांडे म्हणाले. ‘त्यांनी रिर्टन केले पैसे, म्हणजे त्यांच्याकडेच होते’ उद्धव ठाकरेंना याची कल्पना आहे का? यावर “इतकं काही मला माहित नाही. हे नेते तिथपर्यंत पोहोचूच देत नसतील, तर उद्धव ठाकरेंना कसं समजणार?” असं विनायक पांडे म्हणाले.





